

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरवर बोली लावत विकत घेतले होते. मात्र, त्याला संधी दिली जात नव्हती. आज मुंबईने केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्याला संधी दिली. आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकरला पहिले आणि तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. केकेआरविरुद्ध त्याने दोनच षटक टाकले. या दोन षटकामध्ये त्याने १७ धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणामुळे वडील आणि मुलाने 'आयपीएल'मध्ये खेळण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआरने मुंबईसमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले आहे. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज शतक केले. व्यंकटेश अय्यरच्या शतकी खेळीमुळेच केकेआरला १८५ धावा करता आल्या. व्यंकटेश अय्यरने ९ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने ५१ चेंडूममध्ये १०४ धावा केल्या.
मुंबईकडून ऋतिक शौकीनने २ विकेट्स, तर पियुष चावलाने ४ षटकांमध्ये केवळ १९ धावा देत १ विकेट पटकावली. कॅमरन ग्रीन आणि मेरेडिथनेही प्रत्येकी १ विकेट घेतली. मुंबईच्या डी यान्सनची केकेआरच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. त्याने ४ षटकांमध्ये ५३ धावा देत १ विकेट पटकावली.