

bollywood ajay devgn hints to make tanhaji second part or sequel on sixth anniversary of the film he shares post
पुढारी ऑनलाईन :
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने अजय देवगनने चित्रपटाच्या सीक्वेल किंवा पुढील भागाबाबत एक सूचक इशारा दिला आहे. अजयने नेमकं असं काय केलं, ज्यामुळे पुन्हा एकदा ‘तान्हाजी’च्या दुसऱ्या भागाबाबत चर्चा सुरू झाली आहे, ते जाणून घेऊया…
अजय देवगनचा 2020 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अजय देवगनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की, ‘तान्हाजी’चा दुसरा भाग येणार आहे का? अजय देवगन पुन्हा एखाद्या मराठा योद्ध्याची कथा मोठ्या पडद्यावर घेऊन येणार का? असे तर्क का लावले जात आहेत, यामागचं कारण काय आहे, ते पाहूया…
कॅप्शनने वेधलं सगळ्यांचं लक्ष
‘तान्हाजी’ चित्रपटाला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात अजय देवगनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चित्रपटातील वेगवेगळ्या दृश्यांचे ऑइल पेंटिंग शैलीतील पोस्टर्स दिसत आहेत. या पोस्टर्समध्ये अजय देवगनसोबत काजोल, सैफ अली खान आणि शरद केळकर यांचेही फोटो पाहायला मिळतात. मात्र, या पोस्टमधील कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अजय देवगनने मराठीत कॅप्शन लिहिलं आहे
“किल्ला तर जिंकला, पण सिंह गेला.”
यानंतर अजयने पुढे लिहिलं आहे —
“पण कथा अजून संपलेली नाही.”
या एका ओळीमुळेच ‘तान्हाजी’च्या दुसऱ्या भागाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मराठा योद्धा सूबेदार तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा
2020 साली प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं होतं. तर या चित्रपटाची निर्मिती अजय देवगन फिल्म्सने केली होती. हा चित्रपट 16 व्या शतकातील पराक्रमी मराठा योद्धा सूबेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.
या चित्रपटात काजोलने तान्हाजींच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तर सैफ अली खानने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याने महाराजा उदयभान सिंह राठोड याची भूमिका निभावली होती. ‘तान्हाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यामुळे याचा दुसरा भाग येणार आहे का? असे प्रश्न चाहत्यांमध्ये विचारले जात आहेत.