

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील जादुई आवाज आणि कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. गेल्या सात दशकांपासून आपल्या गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाजींची प्राणज्योत अखेर मालवली. मात्र, प्रसिद्धीच्या झगमगाटात वावरणाऱ्या या महान गायिकेचे आयुष्य पडद्यामागे अत्यंत वेदनादायी आणि संघर्षाने भरलेले होते. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली असून एक देदिप्यमान पर्व संपले आहे.
आशाजींच्या आयुष्यातील सर्वात कठीण अध्याय म्हणजे त्यांचे पहिले लग्न. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला होता. हा प्रेमविवाह असला तरी त्यासाठी त्यांना आपली मोठी बहीण लता मंगेशकर आणि संपूर्ण कुटुंबापासून दूर व्हावे लागले होते. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की, त्यांचे सासर अत्यंत कर्मठ होते आणि त्यांना एका गायिकेला आपली सून म्हणून स्वीकारणे जड जात होते. हळूहळू या नात्यात कटुता आली आणि त्यांना मानसिक तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागले.
त्यांच्यावरील अन्यायाचा कळस तेव्हा झाला, जेव्हा त्या आपल्या तिसऱ्या अपत्याच्या (मुलगा आनंद) वेळी गर्भवती होत्या. अशा नाजूक परिस्थितीत त्यांना घराबाहेर काढण्यात आले. पदराशी दोन लहान मुले आणि पोटात तिसरा जीव असताना आशाजी आपल्या माहेरी परतल्या. इतका भयानक काळ सोसूनही त्यांनी कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवला नाही. "जर मी भोसलेजींना भेटले नसते, तर मला माझी तीन मौल्यवान मुले मिळाली नसती," असे त्या मोठ्या मनाने म्हणत असत.
संघर्षाच्या या काळानंतर प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन (पंचम दा) हे आशा भोसले यांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण बनून आले. १९८० मध्ये या दिग्गज जोडीने विवाह केला. काही काळानंतर ते वेगळे राहू लागले असले, तरी त्यांच्यातील संगीताचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर कधीही कमी झाला नाही. वयाची नव्वदी ओलांडली तरी आशाजींचा उत्साह दांडगा होता. दुबईतील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांनी आपल्या ऊर्जेने सर्वांना थक्क केले होते. त्यांच्यासाठी संगीत हे केवळ करिअर नसून तो त्यांचा 'श्वास' होता.
नुकतेच थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशाजींना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची नात जनाई भोसले हिने चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि कोट्यवधी चाहत्यांच्या प्रार्थना अपुऱ्या पडल्या. ९२ व्या वर्षी आशाजींनी जगाचा निरोप घेतला.
हजारो अजरामर गाणी आणि संघर्षाची एक प्रेरणादायी गाथा मागे सोडून आशा भोसले आता अनंतच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. "माणसाचा श्वास थांबला की तो मरतो, माझ्यासाठी संगीत हाच माझा श्वास आहे," असे सांगणाऱ्या आशाजींचे हे शब्द आता कायमस्वरूपी आठवणीत राहतील. संकटे कितीही मोठी असली तरी आपला 'सूर' ढळू द्यायचा नाही, हीच शिकवण त्यांनी आपल्या आयुष्यातून जगाला दिली आहे.