‘तुजं माजं सपान’ मध्ये दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात | पुढारी

'तुजं माजं सपान' मध्ये दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘तुजं माजं सपान’ ही मालिका वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असून मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातही पैलवान असून मालिकेतही तिने पैलवानाची व्यक्तिरेखा साकारली आहे. यामुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेत प्राजक्ताचा कुस्ती खेळण्याचा प्रवास दाखवला जात आहे. पण आता मालिका वेगळे वळण घेणार आहे. मालिकेत आता वीरू आणि प्राजक्ता यांचं लग्न होणार आहे. ते कसं घडलं हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

वीरूची आई त्याचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करत होती. बरेच प्रयत्न करूनही तो काही लग्नाला तयार होत नव्हता. पण आईनी त्याला समजावून लग्नासाठी तयार केलं आहे. आता मालिकेत लग्न पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्ननंतर त्यांच्या आयुष्यात काय फेरबदल होतील? हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आता या दोन पैलवानांचं लग्न कसं होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. कुस्तीच्या या तांबड्या मातीत हळदीचा पिवळा रंग उधळणार आहे. याच तांबड्या मातीतून आता प्रेमाचं तुफान येणार का?, हे आता मालिकेत पाहायला मिळेल. एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंचं लग्न पहिल्यांदाच दाखवलं जाणार आहे. या लग्नामुळे वीरूच्या आयुष्यात काय फेरबदल होतील?, तो कुस्तीच्या आणि लग्नाच्या विरोधात आहे आणि प्राजक्ताच्या येण्यानं कुस्ती त्याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे का?. त्यामुळे तो या परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या लग्नामुळे प्राजक्ताच्या आयुष्यात फार मोठे फेरबदल होणार आहेत. लग्नानंतर कुस्ती खेळता येईल का?, तांबड्या मातीत कुस्ती खेळून पुढे प्रगती करायचं तिचं स्वप्न अपुरं राहील का?, प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्नानंतर वीरेंद्रच्या घरातलं वातावरणही बदलेल का?, वीरूच्या आईला आनंद होईल का? वीरेंद्रने मार्गी लागून संसार करावा, अशी त्यांची इच्छा पूर्ण होईल का?, वीरूच्या डोळ्यांतलं त्याचं स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का? आणि त्यांचा हा प्रवास कसा असेल?, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे.

मालिकेची मूळ कहाणी ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करत आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला जात आहे. या नव्या जोडीचे सामायिक ध्येय आणि स्वप्न काय असेल आणि त्यांची स्वप्नपूर्ती कशा प्रकारे होईल, हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहे. वीरू आणि प्राजक्ता यांच्या या अनोख्या कहाणीची सुरुवात कशी आहे, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button