श्रीदेवी आणि दिव्या भारतीचे कनेक्शन काय?
मुंबई : पुढारी ऑनलाईन
सर्वोत्तम अदाकारा दिव्या भारती आणि बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी यांच्या निधनाने त्यावेळी सर्वांनाच ‘धक्का’ बसला होता. त्यांनी अचानकपणे जगाचा निरोप घेतला होता. श्रीदेवी आणि अभिनेत्री दिव्या भारती यांच्याबद्दलचा हा एक विचित्र योगायोग घडला, तो म्हणजे दिव्या भारतीचा जन्म २५ फेब्रुवारी आणि श्रीदेवी यांचा मृत्यू २४ फेब्रुवारीला झाला. श्रीदेवी आणि दिव्या या दोघींच्या चेहऱ्यात कमालीचे साम्य होते. म्हणूनच त्या दोघींना चाहते बहिणी म्हणायचे. श्रीदेवी यांच्याप्रमाणे दिव्यानेही अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती. पण, तिनेही अकाली जगाचा निरोपही घेतला होता.
दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला होता. दिव्याचा ५ एप्रिल, १९९३ मध्ये आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यावेळी दिव्या केवळ १९ वर्षांची होती. अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून तिचा मृत्यू झाला. पण, ही आत्महत्या होती की हत्या? हे शेवटपर्यंत समजले नाही. त्यामुळे पोलिसांनी दिव्याच्या मृत्यूच्या केसची फाईल बंद केली होती. त्याचप्रमाणे श्रीदेवी यांचा देखील अचानकपणे मृत्यू झाला.
दिव्याचा आकस्मिकपणे झालेला मृत्यू तर श्रीदेवी यांची झालेली अचानक एक्झिटही मन पिळवटून टाकणारीच होती. श्रीदेवी आणि दिव्या भारती या दोघींना बहिणी म्हणण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे दिव्याच्या एक्झिटनंतर तिचे अपुरे राहिलेले चित्रपट श्रीदेवी यांना रिप्लेस करून करण्यात आले होते.
नव्वदच्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘लाडला’मध्ये दिव्या भारतीच्या जागी श्रीदेवी यांना रिप्लेस करण्यात आले होते. या चित्रपटाचे काही भागाचे शूटिंग दिव्या भारतीने शूट केले होते. परंतु, अचानक दिव्याचा मृत्यू झाला. यामुळे हा चित्रपट कसा पूर्ण करायचा? या मोठा प्रश्न दिग्दर्शकापुढे होता. दिव्याशीच मिळता-जुळता चेहरा म्हणून श्रीदेवी यांचीच निवड करण्यात आली. ‘लाडला’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
श्रीदेवी यांनी या भूमिका दमदारपणे साकारल्या. ‘मोहरा’ आणि ‘विजयपथ’ हे दोन चित्रपट दिव्याने साईन तर केले. मात्र, ते पूर्ण करण्याआधीच ती जग सोडून गेली. नव्वदच्या दशकात दिव्या सर्वात अधिक बिझी अभिनेत्रींपैकी एक होती.
वाचा – जेव्हा विवाहित माणसाच्या प्रेमात पडल्या होत्या श्रीदेवी
दिव्या श्रीदेवीच्या लहान बहिणीसारखीच दिसते, अशा अनेक कॉमेंट्स चाहते करत होते. मोठ-मोठ्या दिग्दर्शकानींही ते मान्य केले होते. या दोघींमधील आणखी एक महत्वाचे साम्य म्हणजे दिव्या आणि श्रीदेवी या दोघींनीही करिअरची सुरूवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली होती.
सेटवर घडली होती विचित्र घटना
मृत्यूनंतर दिव्याचे दोन चित्रपट रिलीज झाले होते. एक ‘रंग’ आणि दुसरा ‘शतरंज’. दिव्याने त्यावेळी अनिल कपूरसोबत लाडला चित्रपटाचे जवळपास ८० टक्के शूटिंग पूर्ण केले होते. नंतर तिच्या जागी श्रीदेवींना घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगवेळी एक विचित्र घटना घडली होती. रवीना टंडनने एकदा सांगितले होते की, ऑफिसच्या एका सीनमध्ये ज्या डायलॉगवर दिव्या भारती अडखळत होती. श्रीदेवीदेखील त्या डायलॉगवर अडखळायच्या, या घटनेनंतर चित्रपटाची टीम शूटिंगवेळी घाबरली होती.