

युवराज इंगवले
5 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कोणताही प्रतिकार न होता तालिबानने ताबा मिळवला. या घटनेला शुक्रवारी चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दिवशी काबूलच्या रस्त्यांवर भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण होते. हजारो नागरिक देश सोडून पळून जाण्यासाठी विमानतळावर गर्दी करत होते. अमेरिकेच्या लष्करी विमानाच्या चाकांना लटकून जीवघेणा प्रवास करणार्या लोकांची द़ृश्ये आजही जगाच्या स्मरणात आहेत. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हेलिकॉप्टरमधून देशाबाहेर परागंदा झाले होते; तर दुसरीकडे 20 वर्षे तालिबानशी लढणारे अमेरिका सैन्य आणि नागरिकांना बाहेर काढण्याच्या घाईत होते. या चार वर्षांत अफगाणिस्तान पूर्णपणे बदलला आहे. तालिबानने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला असला, तरी देशांतर्गत परिस्थिती, विशेषतः महिलांच्या अधिकारांबाबत, गंभीर बनली आहे.
तालिबानची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर सर्वात वेदनादायी परिणाम अफगाण महिलांना भोगावा लागला आहे. तालिबानने सत्तेत येताच मुलींच्या आणि महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली, त्यांना नोकरी करण्यापासून रोखले आणि घराच्या चार भिंतीत बंदिस्त केले. एका अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये सध्या जगातील सर्वात गंभीर महिला अधिकार संकट आहे. यूएन विमेन आणि केअर इंटरनॅशनल ऑगस्ट 2025 च्या अहवालानुसार, सप्टेंबर 2023 पासून आतापर्यंत इराण आणि पाकिस्तानमधून 24.3 लाखांपेक्षा जास्त अफगाण शरणार्थी परतले आहेत. यापैकी सुमारे एक तृतीयांश (सुमारे 8 लाख) महिला आणि मुली आहेत. या महिलांना गरिबी, बालविवाह, हिंसाचार, शोषण आणि निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.
2021 मध्ये जेव्हा तालिबानने काबूलवर ताबा मिळवला, तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘अफगाण जनतेने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, असे म्हटले होते. मात्र, या चार वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर तालिबानला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेवर कारवाई करण्याची विनंती करत आहेत. मात्र, तालिबानने टीटीपी हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत, हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तालिबानने आपल्या मागील राजवटीच्या (1996-2001) तुलनेत या वेळी रणनीतीत मोठे बदल केले आहेत. तालिबान 2.0 ची धोरणे तालिबान 1.0 प्रमाणेच दडपशाहीची आहेत; पण त्यांची जनसंपर्क रणनीती आणि प्रादेशिक मुत्सद्देगिरीत मोठा बदल झाला आहे. तरीही, मूळ विचारधारा सोडलेली नाही. यामुळे अफगाणिस्तानचे भवितव्य आजही तितकेच अनिश्चित आणि आव्हानात्मक आहे, जितके ते चार वर्षांपूर्वी होते.