संतोष रासकर
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करत असताना ‘डिझाईन इन इंडिया’ला बळ दिले पाहिजे. भारतीय दर्जा आणि गुणवत्ता ही जागतिक दर्जा आणि गुणवत्तेची ओळख बनली पाहिजे. आपल्याकडे ती गुणवत्ता आहे आणि म्हणून ‘डिझाईन इन इंडिया’ या आव्हानाला घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, यावर भर दिला. डिझाईन तंत्रज्ञानातील भविष्य आशादायक असल्याचे हे संकेत आहेत.
खरे तर, भारतातील डिझाईन उद्योग झपाट्याने विकसित होत आहे, देशाच्या आर्थिक वाढीचा आणि जागतिक स्थितीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे. पारंपारिक कला आणि हस्तकलेपासून ते अत्याधुनिक डिजिटल डिझाइनपर्यंत, भारत नवकल्पना, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक ओळख यासाठी एक धोरणात्मक साधन म्हणून डिझाईन आणि त्यातील उद्योगाचा स्वीकार करत आहे.
ऐतिहासिकद़ृष्ट्या भारताच्या डिझाईनची मुळे त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेली आहेत. शतकानुशतके जागतिक डिझाईन ट्रेंडवर प्रभाव पाडणारे क्लिष्ट कापड, वास्तुकला आणि हस्तकलेचे प्रमाणीकरण भारताने केले आहे. जागतिक स्तरावर पहिल्या डिझाईन विद्यापीठाची निर्मितीदेखील भारतात अगदी इसवी सन पूर्वीच्या सहाव्या शतकात झाली आहे. तथापि, आधुनिक भारताच्या उभारणीत पहिल्या टप्प्यात आपण औद्योगिक प्रगतीचे उद्दिष्ट ठेवल्याने आपण आपला फोकस विज्ञान, तंत्रज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वळविला. त्यातूनच आपले डिझाईन उद्योग आणि त्याचे शिक्षण याकडे दुर्लक्ष झाले, तरीदेखील काळाची पावले ओळखत आपण आता डिझाईन उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. अलीकडच्या दशकांमध्ये डिझाइन उद्योगाने पारंपरिक सीमांच्या पलीकडे विस्तार केला आहे, ज्यामध्ये औद्योगिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वापरकर्ता इंटरफेसर्(ीळ), वापरकर्ता अनुभव (णद) डिझाईन, फॅशन डिझाईन, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, वेब डिझाईन, व्हर्च्युअल रिअॅलिटी, प्रॉडक्ट डिझाईन आणि बरेच काही यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
आशादायक संधी असूनही भारतातील डिझाईन उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे डिझाईन शिक्षणाची गुणवत्ता. भारतामध्ये काही उच्चस्तरीय डिझाइन शाळा आहेत; परंतु देशभरात दिल्या जाणार्या शिक्षणाच्या गुणवत्तेत असमानता आहे. अनेक डिझाईन संस्थांमध्ये सर्वसमावेशक डिझाईन शिक्षण देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, विद्या शाखा आणि संसाधनांचा अभाव आहे, ज्यामुळे उद्योगात कौशल्याची कमतरता निर्माण होते. त्याच बरोबर डिझाईन क्षेत्राकडे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा कल नाही. दुसरे कारण म्हणजे, धोरणात्मक मालमत्ता म्हणून डिझाईनची ओळख नाही. अनेक क्षेत्रांमध्ये डिझाईनकडे अजूनही नावीन्यपूर्ण धोरणात्मक साधन म्हणून न पाहता सौंदर्याचा विचार म्हणून पाहिले जाते. ही मानसिकता व्यवसाय वाढ आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी डिझाईनची व्याप्ती आणि प्रभाव मर्यादित करू शकते.
तिसरे म्हणजे, बौद्धिक संपदा (खझ) समस्या. डिझाईनमध्ये बौद्धिक संपदेचे संरक्षण हा भारतातील चिंतेचा विषय आहे. डिझाईनर सहसा कॉपीराईट, पेटंट आणि साहित्यिक चोरीशी संबंधित समस्यांशी संघर्ष करतात, ज्यामुळे सर्जनशीलता आणि नावीन्य कमी होऊ शकते. चौथे म्हणजे, परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधणे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर यासंबंधीचे धोरण ठरविले जात आहे. देशात चांगल्या शिक्षण संस्था काम करत आहेत. भारतातील डिझाईनचे भवितव्य आशादायक दिसते. डिझाईन आणि तंत्रज्ञानाचे अभिसरण उद्योगाच्या भविष्याला आकार देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (अख), आभासी वास्तविकता (तठ) आणि थ्रीडी प्रिंटिंग यासारखी उदयोन्मुख तंत्रज्ञाने डिझाईन इनोव्हेशनसाठी नवीन सीमा उघडत आहेत. अधिक इमर्सिव्ह आणि वैयक्तिक अनुभव तयार करण्यासाठी डिझायनर टूल्सचा वापर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर येणार्या काळात डिझाईन क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी नव्या पिढीला मिळणार आहेत, हे निर्विवाद सत्य आहे.