

मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा माध्यमांमध्ये सशक्त, दमदार आणि चतुरस्र अभिनयाने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रुंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं, हे तत्त्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी अगदी छोट्याशा भूमिकेतूनही स्वतःचं वेगळेपण सिद्ध केले.
कला, क्रीडा, शिक्षण, अर्थ, विज्ञान, मनोरंजन आदी कोणत्याही क्षेत्रामध्ये दिले जाणारे पुरस्कार हे एकीकडे स्वीकारणार्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेणारे असतात, तर दुसरीकडे त्याच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारे असतात. बदलत्या काळात पुरस्कारांची दुनिया ‘बहरलेली’ असली, तरी काही पुरस्कारांचे मोल हे अनन्यसाधारण असते. अलीकडेच ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झालेला विष्णुदास भावे पुरस्कार हाही असाच सन्मान मानला जातो. नाट्य क्षेत्रात विशेष योगदान देणार्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मानाचा समजला जातो. त्यामुळे दरवर्षी पुरस्कार प्राप्त कलाकारांच्या नावाची घोषणा आणि रंगभूमीदिन कार्यक्रमांकडे सर्वांच्या नजरा असतात. यंदा हे या पुरस्काराचे 57 वे वर्ष आहे. येत्या पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी सुहास जोशी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
सुहास जोशी यांची अभिनय कारकीर्द पाच दशकांची आहे. 1977 मध्ये गोवा हिंदू असोसिएशनने रंगभूमीवर आणलेल्या विजया मेहता यांच्या ‘बॅरिस्टर’ या लोकप्रिय नाटकातून त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. खरे पाहता, विजयाताईंच्या नाटकामध्ये निवड होणे हेच त्याकाळात एखाद्या पुरस्कारासारखं होते. त्यामुळे सुहास जोशी यांनी पदार्पणातूनच मुळी चौकार लगावला होता. नंतरच्या काळात ‘घरोघरी’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘नटसम्राट’, ‘कन्यादान’, ‘अग्निपंख’, ‘कथा’ अशा विविध नाटकांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. त्यापूर्वी सई परांजपे यांच्या ‘पत्तेनगरी’ या बालनाट्यातून सुहास जोशी झळकल्या होत्या. त्या काळात आकाशवाणी पुणे केंद्रावर होणार्या बालोद्यानमध्ये त्या भाग घेत असत.
महाविद्यालयीन जीवनात भालबा केळकरांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनतर्फे नाटकातून काम त्या करू लागल्या. दिल्लीत एनएसडीमध्ये अभिनयाचे धडे गिरवीत असताना सुहास जोशी यांनी नृत्य प्रशिक्षणही घेतले. कथकली, मणिपुरी, कथक, भरतनाट्यम् हे सारे अभिजात नृत्यप्रकार आणि लोकनृत्यही त्या शिकल्या. ‘एकच प्याला’, ‘ही श्रींची इच्छा’, ‘आनंदी गोपाळ’, ‘पंखांना ओढ पावलांची’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘स्मृतिचित्रे’, ‘मुलगी झाली हो’, ‘सातच्या आत घरात’ या विविध विषयांवरील नाटक, बोलपट आणि चित्रपटांमधील सुहास जोशींचा अभिनयात हा त्यांचा वकुब विलक्षण असल्याचे दर्शवणारा आहे.
गतवर्षी आलेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘इंदू’ ही व्यक्तिरेखाही अफलातून होती. या दिलखुलास आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असणार्या सुहास जोशी या स्पष्टपणा जपणार्या आहेत. भूमिकांच्या लांबी-रुंदीपेक्षा आशयातील ‘ती’चं स्थान मला नेहमी महत्त्वाचे वाटते, असे त्या सांगतात. मालिकांमध्ये होणारी विषयाची फरफट पटत नाही. विषय किती ताणायचे, यालाही मर्यादा हव्यात, असे मतही त्यांनी एका मुलाखतीत नोंदवले होतं. आजवरच्या आपल्या कारकिर्दीबाबत त्या समाधानी आहेत. माणसाने आयुष्याला सामोरे जाताना त्याचं खरेपण जपावे, अनुभवसमृद्ध होत राहावे आणि आपल्या आवडीनुसार आपला प्रवास सुरू ठेवावा, या मताची मी असल्याचे त्या सांगतात. रंगभूमीवर सतत नवीन प्रयोग झाले पाहिजेत, असा त्यांचा ध्यास असतो. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातील त्यांचा सहभागही लक्षवेधी ठरला. नवोदित कलाकारांना मदत करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात. तरुण कलाकारांना काही नव्याने प्रयोग करून पाहायचे असल्यास त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ऐंशी वर्षाच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांच्यातील अभिनयशैली जराही सुरकुतलेली नाही. उलट नव्या पिढीच्या बरोबरीने टवटवीतपणाने त्या वाटचाल करत आहेत.