

राष्ट्र भक्कम करायचे असेल तर समाज भक्कम करावा लागतो. समाजाला भ्रष्टाचाराची कीड लागली असेल तर त्यातून समाजाला बाहेर काढणे, हे जिकिरीचे काम असते. मोदीजींनी देशाची सूत्रे घेतल्यापासून सर्वाधिक प्रहार हा भ्रष्टाचार आणि सरकारमधील दलालीवर केला. देशातील विविध क्षेत्रांत दलालांची साखळी संपविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. डीबीटी, जनधन आणि आधार यांतून त्यांनी केंद्रातून पाठविलेल्या १०० पैकी १०० रुपये लाभार्थ्याच्या खात्यात पाठवण्याचा पायंडा सुरू केला. त्यांच्यासाठी पद नव्हे, तर व्यवस्था महत्त्वाची आहे. एकदा राहुल गांधींनी २००८ मध्ये सांगितले होते, माझ्या वडिलांच्या काळात १०० पैकी १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचे. परंतु आता तेही पोहोचत नाही. पण, आज स्थिती पूर्णत: बदलली आहे.
2014 मध्ये देशात असलेली प्रचंड अनागोंदी, भ्रष्टाचाराच्या साम्राज्याला कंटाळलेला जनमानस आणि त्यातून देशाला एक नवीन आकार देत, भारताचा चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा झालेला प्रवास... जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर असलेला देश. हा संपूर्ण प्रवास असो की, आज अमेरिकेच्या टॅरिफविरोधात आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा मंत्र घेऊन तितक्याच ठामपणे उभा असलेला भारत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वकौशल्याचा परिचय आजच्या नव्या भारताने दिला आहे. इतिहासातील घोडचुका दुरुस्त करण्यापासून ते आजच्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्याचा निर्धार असा हा कालखंड पाहायला, अनुभवायला आणि त्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता येणे, यासारखे भाग्य नाही. हे सारे ज्या वैश्विक नेत्यामुळे घडले, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
राम मंदिर असो, 370 कलम रद्द करणे असो, तीन तलाकवर बंदी असो, गरीब कल्याणाचा मोठा कार्यक्रम असो, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक किंवा अगदी अलीकडचे ऑपरेशन सिंदूर असो, उपलब्धी सांगायच्या तर क्षेत्र आणि जागा अपुरी पडेल. महिला, शेतकरी, युवा, वंचित अशा प्रत्येक घटकांसाठी शेकडो निर्णय घेतले नाहीत, तर त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडते आहे. 25 कोटी लोक दारिद्ररेषेतून बाहेर येणे, ही सोपी बाब नाही. या 11 वर्षांत 3 कोटी घरे असोत, 15 कोटी घरांना नळ असो, 12 कोटी शौचालयांची निर्मिती असो, 68 लाख फूटपाथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी असो... अशा कितीतरी योजना सांगता येतील. फक्त एक आकडा पुरेसा आहे. 43.8 लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात आलेले आहेत.
विकसित भारताच्या वाटेवरील सर्वांत महत्त्वाचा भागीदार असलेली आमची नारीशक्ती 2029 मध्ये 33 टक्के आरक्षणासह संसद आणि राज्य विधानसभांमध्ये दिसणार आहे. स्टार्टअप, एम्स, आयआयएम, मेडिकल कॉलेज यांची संख्या सातत्याने वाढली आहे. जगाच्या 49 टक्के डिजिटल व्यवहार करणारा आपला भारत देश आहे. विमानतळे, रेल्वे, महामार्ग, हरितऊर्जा अशा सर्वच क्षेत्रांत यशाची नवनवी शिखरे आपण गाठतो आहोत आणि हे सर्व काही होऊ शकले ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि त्यांच्यावरील देशवासीयांच्या विश्वासामुळे.
राजकारणात सलग 25 वर्षे संवैधानिक पदांवर कार्यरत असणे ही सोपी गोष्ट नसते. सलग 25 वर्षे पदांवर राहूनसुद्धा लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत राहणे, नव्हे तो वैश्विक होणे, हेच या प्रवासाचे फलित आहे. ही केवळ त्यांच्या लोकप्रतिनिधित्वाची 25 वर्षे नाहीत, तर संवैधानिक पदांवरील कर्तव्यपूर्तीची आहेत. हा लोकसेवेचा कालखंड आहे. लोककल्याणाचा, सुशासनाचा, नेतृत्वकौशल्याचा, भारतीय मानबिंदू उंचावण्याचा आहे.
नरेंद्र मोदीजींची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण, त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग कुठला असेल तर ते सर्वांत आधी एक स्वयंसेवक आहेत. पूर्णवेळ प्रचारक होते. त्यानंतर सुद्धा संघटनमंत्री म्हणून मोठ्या कालखंडात त्यांनी भाजपमध्ये काम केले. गेली 11 वर्षे ते पंतप्रधानपदी असताना त्यांनी जो राष्ट्रधर्म जपला आहे, जी कर्तव्यपरायणता जपली आहे, त्याचे रहस्य या त्यांच्या स्वयंसेवकत्वात दडले आहे. स्वयंसेवक हा कर्मयोगी असतो आणि त्याची निर्णयप्रक्रिया अतिशय साधी, सोपी आणि सरळ असते. अगदी आपल्या दोन मित्रांचेच भांडण सुरू असेल तर कोणता तोडगा काढला तर त्यात त्या दोघांचे हित सामावले असेल, घरातील एखादा वाद असेल तर कोणता तोडगा संपूर्ण कुटुंबासाठी हितकारक आहे, हे ओळखून त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. मोदींवर तर राष्ट्राची जबाबदारी आहे. त्यामुळे राष्ट्रहिताशी ते कधीही तडजोड करीत नाहीत. ज्यातून राष्ट्रहित साधले जाणार आहे, तोच निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असतो.
राष्ट्र भक्कम करायचे असेल तर समाज भक्कम करावा लागतो. समाजाला भ्रष्टाचाराची कीड लागली असेल तर त्यातून समाजाला बाहेर काढणे, हे जिकिरीचे काम असते. मोदीजींनी देशाची सूत्रे घेतल्यापासून सर्वाधिक प्रहार हा भ्रष्टाचार आणि सरकारमधील दलालीवर केला. देशातील विविध क्षेत्रांत दलालांची साखळी संपविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. डीबीटी, जनधन आणि आधार यातून त्यांनी केंद्रातून पाठविलेल्या 100 पैकी 100 रुपये लाभार्थ्याच्या खात्यात पाठवण्याचा पायंडा सुरू केला. त्यांच्यासाठी पद नव्हे, तर व्यवस्था महत्त्वाची आहे. एकदा राहुल गांधींनी 2008 मध्ये सांगितले होते, माझ्या वडिलांच्या काळात 100 पैकी 15 पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचे. पण, आता तेही पोहोचत नाहीत. पण, आज स्थिती पूर्णत: बदलली आहे.
राष्ट्र म्हणून एक भक्कम व्यवस्था उभी करणे आवश्यक असते. शत्रूला नामोहरम करते, तेच राष्ट्र सामर्थ्यशाली असते. 2016 मध्ये उरीचा हल्ला झाला तेव्हा अवघ्या 11 दिवसांत भारताने सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले. पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ नष्ट केले. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून कडक शब्दांत समज दिली. 2019च्या प्रारंभी पाकिस्तानने पुलवामामध्ये पुन्हा आगळीक केली. त्याला बालाकोटच्या हवाई हल्ल्यांनी उत्तर दिले गेले. यात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले करीत दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले. या दोन घटनांनी भारताच्या संरक्षणविषयक धोरणाच्या दिशा स्पष्ट केल्या. नवा भारत कसा असेल, हे मोदीजींनी संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले. हे भारताचे ‘न्यू नॉर्मल’ होते. आता अलीकडे पहलगाम झाले, त्याला ऑपरेशन सिंदूर हे उत्तर होते.
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपले पंतप्रधान आहेत. म्हणून महाराष्ट्राचे विषय आले तर मोदीजींच्या प्राधान्यक्रमावर ते असतात. इंदू मिलच्या स्मारकासाठी 3500 कोटींची जागा एका झटक्यात देणे असो की, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी ते भक्कमपणे पाठीशी उभे असतात. मोदीजींनी महाराष्ट्राचा एकही विषय प्रलंबित ठेवला नाही. यावर्षी तर प्रधानमंत्री आवास योजनेतील 30 लाख घरे त्यांनी महाराष्ट्राला दिली. आज महाराष्ट्रात 10 लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, यामागे निश्चितपणे मोदीजींचे भक्कम पाठबळ आहे.
महाराष्ट्र हे सातत्याने एफडीआयमध्ये क्रमांक 1 चे राज्य राहिले आहे. यामागे सुद्धा मोदीजींचा भक्कम पाठिंबा आहे. वाढवण पोर्ट असेल, नवी मुंबईचे विमानतळ असेल, पुण्याचे नवीन विमानतळ, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण, अमरावती विमानतळ, अमरावतीचा टेक्स्टाईल पार्क, गडचिरोली पोलाद सिटी, पालखी मार्ग, मेट्रोचे मुंबई, नागपूर, पुण्यातील प्रकल्प, पालखी मार्ग, छत्रपती संभाजीनगरमधील डीएमआयसी, ऑरिक सिटी, जलसंधारणाचे प्रकल्प, त्यातही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेषत्वाने मिळालेले पॅकेज, जे अन्य कुठल्याही राज्यांना मिळालेले नाहीत, प्रत्येक प्रकल्पात मोदीजी भक्कमपणे उभे राहिले आणि आहेत.
नरेंद्र मोदीजींशी अनेकदा वैयक्तिक भेटी झाल्या, अनेकदा त्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यामुळे समस्या सांगितली की, त्यावरील समाधान त्यांच्याकडे हमखास मिळते. दोन गोष्टीत ते कधीही गल्लत करीत नाहीत. जेव्हा पक्षाचा विषय असतो, तेव्हा ते सरकार मध्ये आणत नाहीत आणि जेव्हा सरकारी विषय असतो, तेव्हा पक्ष मध्ये आणत नाहीत. अगदी भेटीच्या वेळेतही पक्ष आणि विकासाचे विषय अशी स्वतंत्र रचना चर्चेची असते. या राष्ट्रनेत्याच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो, त्यासाठी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, यासाठी मी त्यांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा देतो.