

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्याने 31 तास वाहतूक ठप्प झाली. त्या गदारोळात ससा आणि कासवाची भेट झाली. पुढे काय झाले? ऐका तर...
ससा : अरे भाऊ कासवा, तूही आलास. मला गाठलेस तू? तुला हे कसं काय शक्य झाले?
कासव : आलो हळूहळू कसा तरी! अरे दादा, पण तू अजून इथेच कसा?
ससा : काय सांगू कासवा. ट्रॅफिक जॅम. टुणटुण उड्या मारत पुढे सरकत आलो कसाबसा!
कासव : मग तू थोडी विश्रांती घेतली असशील नेहमीप्रमाणे?
ससा : कसली डोंबलाची विश्रांती घेतोय? सगळ्या वाहनांचा धूर माझ्या नाका-डोळ्यांत जातोय. मला पुढचे दिसायची पंचाईत.
कासव : होय. तुझा रंगपण बदललाय. घरी गेल्यावर दहा रुपयांची डिटर्जंट पावडर बादलीत घाल आणि त्यात दहा मिनिटे उडी मारून दडी मार.
ससा : म्हणजे काय होईल?
कासव : म्हणजे तुझ्या अंगावरचे सगळे डाग निघून जातील. बाय द वे, या तीस तासांत काही खायला मिळाले का तुला?
ससा : लेका काय खाणार? आजुबाजूचे गवत सगळे करपून गेले आहे.
कासव : मग काय खाल्लंस?
ससा : लहान-लहान मुलांनी टाकून दिलेले बिस्किटाचे तुकडे, फरसाण आणि केळीच्या साली. मर्दा, जॅम अॅसिडिटी वाढलीय. पाण्याचा एक थेंब मिळाला नाही रे!
कासव : टोल नाक्यावर तरी काही मिळाले की नाही?
ससा : टोल नाकेवाले म्हणाले, लवकर पळ, नाही तर पेकाटात काठी घालीन. मग, ऐंशीच्या स्पीडने पळालो.
कासव : मग, आता काय रे करायचे?
ससा : एक आयडिया आहे. मी तुझ्या पाठीवर बसेन आणि तू मला हळूहळू मुंबईच्या दिशेने घेऊन जा.
कासव : याच्या बदल्यात तु मला काय देशील?
ससा : मी तुला शरणचिठ्ठी देईन. ‘इथून पुढे तुझ्याबरोबर कधीही शर्यत लावणार नाही.’