

आज एका अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे, ज्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाने प्रेरित होऊन संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसेच सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) जोडलेले लाखो लोक त्यांचा परमपूज्य सरसंघचालक असाच आदरभावपूर्ण उल्लेख करतात. होय, मी मोहन भागवत यांच्याबद्दलच बोलतोय. योगायोग असा की, आरएसएसची शताब्दी साजरी करत असलेले वर्ष त्यांचेही 75 व्या वाढदिवसाचे वर्ष आहे. मी त्यांना दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आज 11 सप्टेंबर. खरे तर हा दोन परस्परविरोधी घटनांचे स्मरण करून देणारा दिवस. यापैकी पहिली घटना म्हणजे 1893 ची. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये ऐतिहासिक भाषण केले होते. अमेरिकेतील भाषणातील ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो’ या अवघ्या काही शब्दांनी त्यांनी सभागृहात उपस्थित हजारो लोकांची मने जिंकली होती. त्यांनी भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेची आणि विश्वबंधुत्वाच्या तत्त्वाची जगाला ओळख करून दिली. आता दुसरी घटना म्हणजे 9/11 च्या क्रूर दहशतवादी हल्ल्यांची. खरे तर, दहशतवाद आणि कट्टरतेच्या धोक्यामुळे याच विश्वबंधुत्वाच्या तत्त्वावर हल्ला झाला होता. माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. त्यांचे वडील दिवगंत मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला जवळून काम करण्याचे भाग्य लाभले. माझ्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात मी त्यांच्याबद्दल अगदी सविस्तर लिहिले आहे. कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित असूनही त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी स्वतःला वाहून घेतले होते. गुजरातमध्ये संघाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मधुकरराव यांची राष्ट्रनिर्माणासाठीची तळमळ इतकी होती की, त्यांनी मुलगा मोहनजी यांची जडणघडणच भारताच्या पुनरुत्थानासाठी केली होती.
मोहनजी हे 1970 च्या दशकाच्या मध्यात संघाचे प्रचारक बनले. प्रचारक हा शब्द ऐकल्यावर एखाद्याला कदाचित प्रचारक म्हणजे केवळ प्रचार करणारा किंवा मोहीम चालवणारा, विचारांचा प्रचार, प्रसार करणारी व्यक्ती असे वाटू शकते; पण जे कोणी संघाच्या कार्यपद्धतीशी परिचित आहेत, त्यांना याची जाणीव आहे की, प्रचारकांची ही परंपरा संघटनेच्या कार्याचा गाभा आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन हजारो तरुणांनी भारत प्रथम हे ध्येय साध्य करण्यासाठी घरदार आणि कुटुंबाचा त्याग करत आयुष्य समर्पित केले. संघातील त्यांची सुरुवातीची वर्षे भारतीय इतिहासातील एका अतिशय काळ्या कालखंडाशी मिळतीजुळती आहेत. याच काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर कठोर आणीबाणी लादली होती. लोकशाही तत्त्वांना महत्त्व देणार्या आणि भारत समृद्ध व्हावा अशी इच्छा असणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणीबाणीविरोधी चळवळ बळकट करणे स्वाभाविक होते. मोहनजी आणि असंख्य संघाच्या स्वयंसेवकांनी नेमके हेच केले. त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि मागास भागात विशेषतः विदर्भात व्यापक प्रमाणात काम केले. यामुळे गरीब आणि दलितांना भेडसावणार्या आव्हानांची त्यांना जाणीव झाली.
गेल्या काही वर्षांमध्ये मोहनजींनी संघात विविध पदे भूषवली. यातील प्रत्येक कर्तव्य त्यांनी कौशल्याने पार पाडले. 1990 च्या दशकात अखिल भारतीय शारीरिक प्रमुख म्हणून मोहनजी यांच्या कार्याचे आजही अनेक स्वयंसेवक स्नेहपूर्वक स्मरण करतात. या काळात त्यांनी बिहारच्या गावांमध्ये काम करताना अमूल्य वेळ व्यतीत केला. या अनुभवांमुळे तळागाळातील समस्यांशी ते अधिक खोलवर जोडले गेले. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ते अखिल भारतीय प्रचारप्रमुख बनले. 2000 मध्ये ते सरकार्यवाह झाले आणि येथेही त्यांनी कामाच्या अनोख्या शैलीने कठीण परिस्थिती सहजतेने आणि अचूकतेने हाताळली. 2009 मध्ये ते सरसंघचालक बनले आणि आजही ते अतिशय उत्साहाने काम करत आहेत. सरसंघचालक असणे ही केवळ संघटनात्मक जबाबदारी नाही. असाधारण व्यक्तींनी वैयक्तिक त्याग, उद्देशाची स्पष्टता आणि भारतमातेप्रती अतूट समर्पणासह ही भूमिका पार पाडली आहे. मोहनजी यांनी जबाबदारीच्या विशालतेला पूर्ण न्याय देण्यासोबत स्वतःची ताकद, बौद्धिक खोली आणि सहृदय नेतृत्व याचीही जोड दिली आहे, जे सर्व ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वाने प्रेरित आहे.
मोहनजींनी त्यांच्या हृदयात जपलेल्या आणि त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केलेले दोन गुण मी आठवायचे म्हटले, तर ते आहेत सातत्य आणि जुळवून घेणे. त्यांनी नेहमीच कठीण प्रसंगांमध्ये संघटनेचे नेतृत्व केले आहे. सर्वांना अभिमान असलेल्या मुख्य विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही आणि त्याच वेळी समाजाच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण केल्या आहेत. त्यांचे तरुणाईशी अगदी सहज नाते आहे आणि म्हणूनच त्यांनी नेहमीच अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात सामील करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते अनेकदा सार्वजनिक भाषणात आणि लोकांशी संवाद साधताना दिसतात, जे आजच्या गतिमान आणि डिजिटल जगात खूप लाभदायक ठरले आहे.
व्यापकपणे सांगायचे तर, संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासातील मोहनजींच्या कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी कालखंड मानला जाईल. गणवेशातील बदलापासून ते शिक्षा वर्गांमध्ये (प्रशिक्षण शिबिरांमध्ये) सुधारणा करण्यापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले.
खासकरून कोरोना मोहनजींनी केलेले प्रयत्न मला आठवतात, जेव्हा मानवजातीने आयुष्यात पहिल्यांदाच अशा महामारीचा सामना केला होता. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पारंपरिक उपक्रम सुरू ठेवणे आव्हानात्मक बनले होते. मोहनजींनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला. जागतिक आव्हानांच्या संदर्भात संस्थात्मक चौकटी विकसित करताना ते जागतिक द़ृष्टिकोनांशी निगडित होते. त्यावेळी सर्व स्वयंसेवकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करताना गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिरे भरवण्यात आली. आम्ही आमचे अनेक कष्टकरी स्वयंसेवकदेखील गमावले; परंतु मोहनजी यांची प्रेरणा अशी होती की, त्यांचा दृढनिश्चय कधीही डगमगला नाही.
खासकरून कोरोना मोहनजींनी केलेले प्रयत्न मला आठवतात, जेव्हा मानवजातीने आयुष्यात पहिल्यांदाच अशा महामारीचा सामना केला होता. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पारंपरिक उपक्रम सुरू ठेवणे आव्हानात्मक बनले होते. मोहनजींनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला. जागतिक आव्हानांच्या संदर्भात संस्थात्मक चौकटी विकसित करताना ते जागतिक द़ृष्टिकोनांशी निगडित होते. त्यावेळी सर्व स्वयंसेवकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करताना गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिरे भरवण्यात आली. आम्ही आमचे अनेक कष्टकरी स्वयंसेवकदेखील गमावले; परंतु मोहनजी यांची प्रेरणा अशी होती की, त्यांचा दृढनिश्चय कधीही डगमगला नाही.
या वर्षारंभी नागपुरातील माधव नेत्र चिकित्सालयाच्या उद्घाटनादरम्यान, मी असे म्हटले होते की, संघ हा अक्षयवट सारखा आहे, एक शाश्वत वटवृक्ष जो आपल्या देशाच्या राष्ट्रीय संस्कृती आणि सामूहिक चेतनेला ऊर्जा देतो. मूल्यांमध्ये रुजवण झाल्याने या अक्षयवटाची मुळे खोलवर आणि मजबूत आहेत. मोहन भागवत यांनी या मूल्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी ज्या आत्मियतेने स्वतःला समर्पित केले आहे, ते खरोखरच प्रेरणादायी आहे.