

राजेंद्र जोशी
इथेनॉल, हायड्रोजन आणि अवकाश संशोधनात नव्या शक्यता निर्माण होत आहेत. त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीकडे राजकारणापेक्षा राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
ब्राझीलमध्ये ४० वर्षे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर सुखेनैव चालला आहे. भारतातही २०१८ साली जाहीर झालेल्या जैवइंधन धोरणानंतर आठ वर्षे तो विनातक्रार सुरू होता. परंतु, अचानक देशाच्या राजकारणाने घेतलेल्या एका वळणात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण टीकेचे बनले. त्यातच भारतात हायड्रोजनवर चालणार्या पहिल्या रेल्वेचा प्रवास सुरू झाला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील या चमत्कारी बदलाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असल्या, तरी यापुढे भारतीयांना कोणत्या विषयाला राजकारणात स्थान द्यायचे, याचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.