

मयुरेश वाटवे
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार गोव्यात. मग, गोव्यात निवडणुकीची तयारी करायची सोडून काही नेते लंडनवाऱ्या का करत आहेत? गोव्यात या संबंधातील गूढ वाढले आहे.
विधानसभेच्या २०२२ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने राज्यात १० टक्के मते आणि एक आमदार निवडून आणला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकांत हिंदू मते भाजप-मगोकडे, तर अल्पसंख्याक मते काँग्रेसकडे अशी ढोबळ विभागणी होती. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने हिंदू-ख्रिस्ती मतांचा योग्य समतोल सांभाळत या दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतांना खिंडार पाडण्यात यश मिळवले होते. दोन-तीन प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक लढवली होती. बेरोजगारी, पोगो बिल आणि गोव्याची हरवत चाललेली ओळख. पोगो बिलाद्वारे पर्सन ऑफ गोवन ओरिजिन कोण, याची व्याख्या त्यांना करायची होती. १९६१ पूर्वी ज्यांचे पालक गोव्याचे नागरिक होते ते पर्सन ऑफ गोवन ओरिजिन असे त्यांचे म्हणणे आहे. ढोबळ मानाने हे आता सर्वांनीच मान्य केले असले, तरी ते बिल मंजूर झालेले नाही. ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो गोव्याची हरवत चाललेली ओळख.
गोव्याची ओळख वाचवण्यासाठी म्हणून स्थापन झालेल्या या बिगर सरकारी संस्थेचे २०२२ मध्ये राजकीय पक्षात रूपांतर झाले. रिअल इस्टेटमध्ये दिल्लीवाल्यांचे झालेले आक्रमण, एकेका गावात प्रकल्पाच्या नावाखाली स्वतंत्र वसाहत उभारण्याच्या प्रयत्नामुळे स्थानिक उपरे ठरतील की काय, अशी एक भीती निर्माण झाली. गोव्यातील बरेच तरुण नोकरी-धंद्यानिमित्त यूकेमध्ये आहेत. त्यांना रिव्होल्यूशनरी गोवन्सचे मुद्दे आवडले. गोव्यातील गावांची ओळख राखण्याचा प्रयत्न भावला आणि त्यांनी निवडणुकीत पक्षाला मोठ्या प्रमाणात फंडिंग केले. आपल्या नातेवाईकांना, इष्टमित्रांना रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सांत आंद्रे या तिसवाडी तालुक्यातील मतदारसंघात वीरेश बोरकर हे त्यांचे एकमेव आमदार निवडून आले; मात्र गेल्या वर्ष-सहा महिन्यांपासून रिव्होल्यूशनरी गोवन्समध्ये फूट पडली आहे. प्रदेशाध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांचे पटत नसल्याच्या बातम्या आल्या. त्यातून मनोज परब यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून पक्ष आणि आमदार यांच्यात वितुष्ट आलेले आहे. त्यामुळे यूकेमधील त्यांचे पाठिंबादारही बिथरले. पक्षात भांडणे सुरू होण्यापूर्वी वीरेश लंडनला जाऊन आले तेव्हा त्यांना तिथे खूप चांगला पाठिंबा मिळाला. त्यांचे स्वागत झाले; मात्र आज परिस्थिती बदलली आहे. गोवा आणि गोमंतकीयांची ओळख हा मुख्य मुद्दा असलेला आणखी एक पक्ष म्हणजे गोवा फॉरवर्ड. अलीकडेच पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई हे लंडनला जाऊन आले. लोकांचे मत आहे की, रिव्होल्यूशनरी गोवन्सकडून दूर जाणारी मते आणि फंड आपल्याला मिळावा, यासाठी हा प्रयत्न होता.
ते १५ दिवस तिथे होते. त्यानंतर आता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव व आमदार एल्टन डिकॉस्ता हे लंडन दौऱ्यावर गेलेले आहेत. त्यांचाही हेतू तोच असावा असा अंदाज आहे. गोव्यातील अल्पसंख्याक समाज नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या सोशल इंजिनिअरिंगने काँग्रेसची गणिते बिघडली होती; मात्र आता रिव्होल्यूशनरी गोवन्समध्येच आलबेल नसल्याने हे मतदार पुन्हा आपल्याकडे यावेत, असा प्रयत्न काँग्रेस करत असावी. अनिवासी गोमंतकीयांचा गोव्यातील मतांवर काही प्रमाणात परिणाम होत असतो. विजय सरदेसाई यांच्याबद्दलही ख्रिस्ती मतदारांना विश्वास वाटतो; पण त्यांचा पक्ष लहान असल्याने त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे ते काँग्रेसलाच पर्याय म्हणून पाहतील, असे मत राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस चांगली आहे म्हणून लोक त्यांना मते देणार नाहीत; पण १५ वर्षांच्या भाजप राजवटीला लोक कंटाळले आहेत. सध्या तरी समोर काँग्रेस हाच पर्याय आहे, असे ते सांगतात. या लंडन वाऱ्यांचा नेमका किती आणि कोणाला लाभ होतो, हे पाहावे लागेल.