

सरकार : सुस्वागतम साहेब! नमस्ते! यावे आपलं स्वागत आहे. (सरकार दरवाजात आलेल्या वादळाशी हस्तांदोलन करत.)
राष्ट्रीय वादळ : यावे म्हणजे काय? यावंच लागलं. चालता बोलता थकवा येतो हल्ली, तरीही यावं लागलं.
सरकार : क्षमस्व! आपल्याला इथवर तातडीने भेटीस यावे लागले... (हाताला धरून खुर्चीत बसवत.)
राष्ट्रीय वादळ : ते विद्यार्थी आंदोलन करून राजीनामा मागत आहेत संबंधित अधिकाऱ्याचा, असे त्यांच्याकडून ऐकले. आम्ही मैदानातून थेट इकडे आलो. तेवढं सरकारनं मनावर घेतलं, तर पुन्हा आमची इथवर येण्यासाठीची धावपळ वाचेल.
सरकार : आपण निरोप दिला असता, तरी चाललं असतं.
राष्ट्रीय वादळ : मुद्दा नाजूक आहे म्हणून. नाही तर निरोपच धाडणार होतो. मैदानावर जाऊन आलो तेव्हा पूर्वीचे दिवस आठवले. एक खतरनाक नेते होते बरोबरीचे. परधर्मीय असून सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले. आमचे प्रतिस्पर्धी होते.
सरकार : समजले. इतिहास वाचला आम्ही; पण आम्हाला भेटण्याचे कारण समजले नाही.
राष्ट्रीय वादळ : बिनकारणाचे तर आम्ही कुठेच जात नाही. काय गं तायडे? (राष्ट्रीय वर्दळीकडे रोख)
राष्ट्रीय वर्दळ : हो. खरंय! कारण, असं की शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे. ते प्रश्न आपल्या सरकारने जास्त वाढवू नयेत.
सरकार : मी सांगेन समजावून. शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लावू.
राष्ट्रीय वादळ : बाहेर अफवा उठूदेत एनडीएमध्ये विलीनीकरण वगैरे; पण आम्ही महायुतीचा विचार तूर्तास बाजूला ठेवला आहे, हे लक्षात असू द्या. ही भेट आमचे मत थेट तुमच्या कानापर्यंत यावे यासाठी आहे. माध्यमांशी संपर्क आणि मतप्रदर्शन करण्यापेक्षा म्हटलं प्रत्यक्ष बोलू.
सरकार : माध्यमं म्हणजे खूप विचित्र प्रकार झाला आहे हल्ली. आम्ही फ्रेंडस् असं बोललो, तरी पुढे आपली वाक्यं टाकून रीळ बनवतात आणि इन्स्टावर टाकतात.
राष्ट्रीय वादळ : मी त्यासाठीच इकडे आलो. त्यांना रीळ बनवून इन्स्टावर टाकू द्या आपल्या भेटीचे. म्हणजे मी मोकळा.
सरकार : समजलो नाही साहेब.
राष्ट्रीय वादळ : समजायच्या आधी आम्ही येतो. मग, सगळे समजते. अहो, महायुतीची गरज नाही आम्हाला तुम्हाला भेटण्यासाठी. युतीशिवाय मातीशी एकनिष्ठ आहोत. काळजी घ्या. येतो. चल तायडे..!