

एका लग्नात सहा वाजंत्री पंगतीत जेवायला बसले. वऱ्हाडी मंडळी अक्षता टाकून भोजन उरकून निघून गेले. हे वाजंत्री भलतेच फेमस. जिकडे जाल तिकडे चांगभलंच आणि उदो उदो!
पहिला : वाह! झकास भोजन असणार. आता त्या 'श्रीं'च्या कोणत्याही समारंभात आपण वाजंत्री म्हणून जायचे नाही. हा शाही थाट बरा.
दुसरा : तिथे साधा पाटसुद्धा देत नव्हते बसायला.
तिसरा : हां नाही तर काय? बरं झालं, मी अजून काही तिकडे उणे दुणे नाही बोललो.
चौथा : तुम्ही कहर करूनच गप्प बसले. काही बोलू नका. इतकं हमरीतुमरीवर येतं का कोण? अहो, सोडून द्यायचं.
पाचवा : समारंभ तर सोडलाच ना. नेहमीचे गिऱ्हाईक होते. हल्ली कमाई जरा थांबली; पण झाली असती यापुढे. आता ते कोर्टात मॅटर चालवणार म्हणे. सगळे सोडून जात आहेत म्हणून.
सहावा : हो, त्यांचे नेहमीचे वाजंत्री आणि वऱ्हाडीपण नाही राहिले. ते एकटेच आपल्या बंगल्यावर घरगुती पद्धतीने समारंभ उरकतात हल्ली. हा हा हा...
पहिला : त्यांच्यात एक जण स्वतःच वाजंत्री म्हणून असंख्य वाद्य तोंडानेच वाजवतो.
दुसरा : हो. कान बधिर होतात ऐकून. पशुपक्षी चिडलेत त्याच्यावर. एका श्वानाने विचारले, तुम्ही जे वाद्य वाजवता तोंडाने त्यात मला भुंकल्याचा भास होतो. घ्या. आता काय बोलणार हा?
तिसरा : हो खरंय. एकदा तर त्याने चक्क ग म भ न च्या बाराखडीचे बारा वाजवले.
चौथा : अरे बाबांनो... वाढा कोणीतरी. सगळे वऱ्हाडी निघून गेले. आमच्याकडे लक्ष द्या कोणीतरी.
वाढपी : (चार तोंडी भांडे मिरवत येतो) साहेब कोशिंबीर आणि भात शिल्लक आहे. तेवढंच गोड मानून घ्या, असं साहेबांनी सांगितलं.
पाचवा : अरे, आम्ही आशेवर 'श्रीं'चे दार सोडून या नाथांच्या दारी आलो. बुंदीचे लाडू तरी वाढा.
वाढपी : सॉरी. कोर्टाने वाजंत्री आणि वऱ्हाडीसहित 'श्रीं'च्या घरी जावे, असे आदेश दिलेत. जिकडचे तिकडे असावे असा निकाल लागला. त्यामुळे आपण तिकडेच भोजनास जावे. बुंदी पाडायचे काम स्वतः 'श्रीं'च्या निवासस्थानी चालू आहे.
सहावा : अरे पण लग्न कोणाचे? काही कारण समारंभाचे?
वाढपी : ते म्हणतात, आदी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं!