

नमस्कार मित्रहो! मी अर्थातच अनर्थ शोधणारा पत्रकार बगळे! सत्ताधाऱ्यांनी अनर्थ ओढवून घेतले; पण त्यातला अर्थ, मर्म सगळं शोधावं लागतं आम्हाला. सचिन बहिर उधमसाहेबांना सोडून गेले, बाकीचे जे होते ते आधीच गेले, काय चाललंय काय या पक्षात. एवढे अंधारात का आहेत उधमसाहेब की, काहीच उजेडात न यावं? यांचे आमदार, खासदार यांना सांभाळून ठेवता येत नाहीत का? याआधी राष्ट्रवादीला सोडून आलेले बहिर सेनेत येतात. पुन्हा सेना (बोबाठा) सोडून पुन्हा फुटलेल्या सेनेत जातात. काय हा घोळ? बहिर हे 'एक पक्ष एक संघ' स्वीकारणार नाहीत, हे सर्वांनाच माहीत असताना बोबाठा इतकी शांत कशी राहू शकते? हे ससा- कासवाच्या गोष्टीसारखे आहे, असे बरेचजण टीकाटिप्पण्या करत आहेत. आता या कासवावर बेल फुले वाहायची वेळ आलीय. मंदिरातल्या कासवाला ही आता हालचाल करावी वाटत आहे. असो, ही लहान मुलांची गोष्ट आणि उदाहरणं राजकारणात नको. कारण, तेवढेही कोणी बालिश नेते नाहीत आपल्याकडे. सुदैवाने उधमजी आणि आदीबाळ सोडले तर. पण तरीही प्राण्यांची उपमा नकोच नको. आपण भले सगळे भले, काय म्हणता?
राहुल बाळ थोडा शांत आहे सध्या. भाषण करताना माईक बाजूला ठेवून दिला बोलता बोलता. मधलं बोलणं काही कळलं नाही बरंच बोलून झाल्यावर. माईक पुन्हा घेऊन विचारलं हा कोणी ठेवला बाजूला? आता काय बोलणार? पुन्हा तेवढं भाषण ऐकायला कोणाला बळ आलंय? असे विचित्र किस्से का घडतात या पक्षांत? कोण नाही सांगेल, तर नवल, तरीही पक्षकार जागे होत नाहीत. यांना विनोदाची सवय झालीय. अशोकमामांची आणि लक्ष्मीकांत यांची कमी भासू नये का आम्हा मराठी लोकांना? मामा (अशोक सराफ) म्हणत असतील, बरं झालं समाजात दुःख दूर करणारी बरीच मंडळी आहेत; पण आम्ही म्हणतो पक्षाचं काय? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा? 'गद्दार गद्दार' म्हणत वेळ घालवण्यापेक्षा ते गद्दार होईपर्यंत आपण डोळे झाकला होतात का? निष्क्रिय आणि निश्चिंत पक्षप्रमुख कोणत्याच कार्यकर्त्याला, आमदाराला आणि खासदाराला उज्ज्वल भविष्याची शाश्वती देईल का राजे? 'फक्त लढ' म्हणत शिवीगाळ होते. याला लढणं म्हणत नाहीत. असो, आपण याची नोंद ठेवावी. आलिया भोगासी असावे सादर, कोणी का असेना गद्दार... तरीही शुभेच्छा! धन्यवाद!