

Pimpri Politics: भाजपाप्रणित केंद्र सरकार संविधान बदलतील, असा आरोप करणार्या काँग्रेसनेच देशामध्ये 1975 मध्ये आणीबाणी लादून संविधानाचा अपमान केला. आतापर्यंत 72 वेळा संविधानात बदल केला. संविधान निर्मितीचे काम केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत दोनदा पाडण्याचे काम काँग्रेसनेच केले होते, अशी टीका माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी शुक्रवारी (दि. 13) केली.
भारतीय जनता पार्टीच्या (पिंपरी-चिंचवड) वतीने नवनिर्वाचित आमदार महेश लांडगे, शंकर जगताप यांचा शाल, श्रीफळ, पगडी आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. निगडी-प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी रावसाहेब दानवे-पाटील बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, भाजपाचे शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, शीतल शिंदे, राजु दुर्गे, अॅड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, विरोधकांकडून आमच्यावर ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमध्ये आम्हाला अपयश आले होते. मग तेव्हा ईव्हीएम घोटाळा झाला नव्हता का? माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे भाजपाला जातीयवादी म्हणतात, त्यांनी 1995 मध्ये आमच्यासोबत युती केली होती.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील एके काळी भाजपासोबत युती केलेली आहे. मात्र, त्यांना आताच आम्ही कसे जातीयवादी वाटायला लागलो. पदे घेताना वाटलो नाही.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला उद्देशुन रावसाहेब दानवे म्हणाले, ना शिवसेना शिल्लक राहील ना राष्ट्रवादी काँग्रेस. भाजपाचे एकेकाळी 2 खासदार होते. त्याचे 302 खासदार झाले.
अचानक निरोप येऊ शकतो..
भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी एकाला मंत्रीपद मिळावे, अशी मागणी या कार्यक्रमात विविध पदाधिकार्यांनी केली. हाच धागा पुढे पकडून रावसाहेब दानवे हे आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांना उद्देशून म्हणाले, कपडे शिऊन ठेवा. अचानक निरोप येऊ शकतो आणि भाजपामध्ये धक्कादायक निरोप येतात.
महापालिकेसाठी भाजपाचा स्वबळाचा दावा
कार्यक्रमादरम्यान आमदार शंकर जगताप, महेश लांडगे यांच्यासह भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी भाजपाने आगामी महापालिका निवडणुका या स्वबळावर लढवाव्या, अशी भूमिका या वेळी मांडली. तसेच, भाजपाचच महापौर होईल, असा दावाही करण्यात आला. त्याचप्रमाणे, शहराला मंत्रीपद मिळायला हवे, अशी मागणीही करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकदिलाने काम करा. आपला विजय निश्चित आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.