वेल्हे : पश्चिम हवेलीसह पानशेत (ता. राजगड) भागात रानडुकरांच्या कळपांचा हैदोस वाढल्याने तसेच दररोज कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे भात, भुईमूग भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हवेली तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आंबी, जांभली, खामगाव मावळ, कल्याण, सोनापूर, वरदाडे, मालखेड आदी गावांसह पानशेत भागातील निगडे मोसे, ओसाडे कोंडगाव, आंबेड, कुरण, वांजळवाडी आदी दोनशे ते तीनशे हेक्टर क्षेत्रातील भात व भुईमूग पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंबी (ता. हवेली) येथील शेतकरी शंकरराव निवंगुणे म्हणाले की, सततच्या पावसामुळे भात पिकांची कापणी रखडली आहे. डोळ्यांसमोर पावसामुळे पिवळं सोनं जमीनदोस्त होत आहे.
भातखाचरांत पाणी साठल्याने दाण्यांना कोंब फुटले असून, पिके सडू लागली आहेत. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम भागासह पानशेत धरणखोऱ्यातील डोंगरी पट्ट्यात रानडुकरांच्या आठ ते दहा कळपांचा हैदोस सुरू आहे. भात पिकांत लोळण घेऊन डुकरे थैमान घालत आहेत. भुईमूग व इतर पिकांचेही रानडुकरांनी नुकसान केले आहे.