पिंपरी : जेलमध्ये जा, नाही तर भाजपसोबत या, असे धमकावत भाजपने विरोधकांना सोबत घेतले आहे. राज्यात हजारो कोटींचे घोटाळे करून राज्यात बजबजपुरी करून ठेवली आहे. पुण्याच्या रिंगरोडची निविदा 6 हजार कोटीने फुगवून स्वत:चे खिसे भरले आहेत, असा आरोप करून भ्रष्टाचारी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
पक्षाचा विजय संकल्प मेळावा पिंपरीगाव येथे शनिवारी (दि.20) झाला. त्यात ते बोलत होते. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, बजरंग सोनवणेंसह मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार यांचा वीणा, श्री संत तुकाराम महाराजांची पगडी, तुळशी पुष्पहार, विठ्ठलाची मूर्ती देऊन गौरविण्यात आले. सभेत सर्वच नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील तीनही जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावर तोंडसुख घेतले.
जयंत पाटील म्हणाले की, 17 कंपन्या राज्याबाहेर गेल्या. राज्य नेतृत्वाला त्या थांबविता आल्या नाहीत. नीट परीक्षेचे पेपर फुटले. बेरोजगारी 11 टक्क्यांवर पोहचली असून, तब्बल 40 लाख युवा बेरोजगार आहेत. नमो महारोजगार मेळाव्यावर लाखोंचा खर्च करून सरासरी 60 जणांना नोकरी देऊन सरकारने बेरोजगारांची थट्टा केली आहे. विरोधातील 25 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यातील 23 जणांना भाजपने सोबत घेतले आहे.
खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, टीडीआर, एसआरए, एसटीपी, ठेकेदारी यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी मश्गुल आहेत. लाडकी बहीण योजनेत दिवसाला 50 रुपये मिळणार असून, त्यातून घर खर्चही चालत नाही.
एमबीबीएस म्हणजे महागाई, भष्टाचारी भाजप सरकार असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी टीका केली.
लाडकी बहिणीला महिन्यात दीड हजार रुपये देता. मग हाताला काम का देत नाही, असा सवाल करीत आ. रोहित पवार यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले. कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करणार्या पोलिस अधिकार्यांना आमची सत्ता आल्यानंतर सोडणार नाही, असा दम त्यांनी भरला. तर, पक्षाचे 85 आमदार निवडून येतील, असेही ते म्हणाले.
शहराचे दोन भाग करून स्थानिक नेते शहराला लुटत आहेत, अशी टीका अजित गव्हाणे यांनी केली. शहर अधोगतीला गेले आहे. ही मंडळी पुन्हा सत्तेत आल्यास शहराची आणखी अधोगती होईल, शहराध्यक्ष कामठे म्हणाले की, पक्षाच्या पडत्या काळात अनेकांनी साथ सोडली. मात्र, आम्ही पक्ष संघटन वाढीसाठी न डगमगता काम केले.