

पिंपरी: पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणाऱ्या हिंजवडी माण ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाला वेग आला असून, माण-हिंजवडी ते बालेवाडी हा पहिला टप्पा येत्या 31 मेपर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दररोजच्या वाहतूक कोंडीतून आयटीयन्सची सुटका होऊ शकेल. प्रशासनाने अंतिम टप्प्यातील कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत.
वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय
हिंजवडी, वाकड, बालेवाडी या भागांमध्ये सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल; तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर उर्वरित मार्गाचे कामही वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण हिंजवडी-शिवाजीनगर मार्ग सुरू झाल्यास पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती घडेल.
मेट्रो सेवा वाढत्या शहरीकरणास आधार
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा 31 मेपर्यंत सुरू झाल्यास, ती केवळ प्रवास सुलभ करणारी सुविधा ठरणार नाही, तर पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाला आधार देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल. आता सर्वांचे लक्ष मे च्या बैठकीकडे लागले आहे, जिथे या प्रकल्पाच्या उद्घाटनावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
15 मेची निर्णायक बैठक
पीएमआरडीए आणि टाटा समूह यांची 15 मे रोजी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत प्रत्यक्ष प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार आहे; तसेच मेट्रो सेवा सुरू करण्याच्या अंतिम तारखेवर निर्णय अपेक्षित आहे. ही बैठक प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यात कामाची प्रगती, सुरक्षा मानके आणि तांत्रिक बाबींची सखोल तपासणी होणार आहे. प्रशासनाचा कल जूनपर्यंत वाट पाहण्याऐवजी मे महिन्यातच सेवा सुरू करण्याकडे असल्याचे दिसून येते. सर्व यंत्रणा वेळेत तयार झाल्यास 31 मे ही तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
आयटी हबसाठी मोठा दिलासा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मेट्रो सेवा सुरू झाल्यास आयटी कर्मचार्यांचा प्रवासाचा वेळ कमी होईल; तसेच हिंजवडी परिसरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या घटेल. त्यामुळे प्रदूषणातही घट होण्याची शक्यता आहे. आयटीयन्स तसेच इतर प्रवाशांचा बालेवाडी स्टेडियमपर्यंतचा प्रवास सुलभ होणार आहे. हा प्रकल्प पुण्यातील आयटी उद्योगासाठी ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती
माण-हिंजवडी ते बालेवाडीदरम्यानच्या 12 स्थानकांचे काम 95 टक्के पूर्ण
किरकोळ दुरुस्ती, सजावटीची कामे अंतिम टप्प्यात.
तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा तपासणी सुरू.
प्रवासी सुविधांची पडताळणी जलदगतीने.
या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन विशेष लक्ष देत आहे.