

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त संसद परिसरातील प्रेरणा स्थळ येथे आणि संविधान सदनातील मध्यवर्ती सभागृहात अभिवादन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रेरणा स्थळ येथे बाबासाहेबांना अभिवादन केले. मात्र त्यानंतर संविधान सदनात पंतप्रधान मोदी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आले नाही, असे म्हणत काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आणि पंतप्रधानांना बाबासाहेबांचा इतका द्वेष का आहे? असा प्रश्नही विचारला. (PM Modi vs Congress)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आदी मान्यवरांनी संसद भवन परिसरात प्रेरणास्थळ येथे बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर संविधान सदनातील मध्यवर्ती सभागृहात देखील मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी पंतप्रधान उपस्थित नव्हते.
यावरून काँग्रेस खासदार निरज दंगी म्हणाले की, ‘आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मात्र, पंतप्रधानांना तिथे येणे योग्य वाटले नाही. हे तेच सेंट्रल हॉल आहे. जिथे भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. पंतप्रधानांना संविधान आणि बाबासाहेबांबद्दलचा इतका द्वेष का आहे?’ असेही ते म्हणाले.