

सिद्धार्थनगर; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये पाच मित्र चक्क रील बनविण्यासाठी 60 फूट उंच आणि 26 वर्षांपासून बंद असलेल्या जीर्ण पाण्याच्या टाकीवर चढले. खाली उतरताना गंजलेली शिडी अचानक तुटल्याने तिघे 50 फुटावरून खाली कोसळले. यात 12 वर्षीय सिद्धार्थचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले तर आणखी दोघे टाकीच्या वरच्या भागातच तब्बल 16 तास अडकून पडले होते. वादळ वारा आणि पावसात थरारक रेस्क्यू ऑपरेशनद्वारे भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने त्या दोघांची सुखरूप सुटका केली.
जमिनीवरून मदतीचे सर्व मार्ग संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लष्कराची मदत मागितली. रविवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर गोरखपूरहून घटनास्थळी दाखल झाले. हवेतच स्थिर राहून हवाई दलाच्या जवानांनी अवघ्या 15 मिनिटांत अत्यंत धाडसी मोहीम फत्ते करत दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.
रील बनवण्याच्या नादात एका कोवळ्या जिवाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या 26 वर्षांपासून बंद असलेली ही टाकी अत्यंत जीर्ण अवस्थेत असूनही, तिथे सुरक्षेसाठी कोणतीही कुंपण किंवा धोक्याची सूचना लावण्यात आली नव्हती. या दुर्घटनेत गोलू (वय 12) आणि सनी (14) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोरखपूरला हलवण्यात आले आहे. पवन (14) आणि शाबान (12) हे दोघे 16 तास टाकीवर अडकले होते आणि त्यांना हवाई दलाने सुरक्षित बाहेर काढले.
टाकीभोवती असलेल्या दलदलीमुळे बचावकार्यात प्रशासनाला अडथळ्यांचा सामना करावा लागला. अडकलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने क्रेन मागवली, मात्र दलदलीमुळे ती निकामी ठरली. त्यानंतर रातोरात 150 मीटरचा कच्चा रस्ता बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. मात्र, मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हे कामही अर्धवट सोडावे लागले. वर अडकलेल्या दोघांपर्यंत दोरीच्या साहाय्याने अन्न-पाणी पोहोचवत प्रशासनाने त्यांना धीर दिली. मात्र काळोख आणि पावसामुळे बचावकार्य गुंतागुंतीचे बनले होते.