

uttar pradesh cm yogi laughs after listening ravi kishan speech bjp mp gorakhpur
पुढारी ऑनलाईन : खासदार रवी किशन शुक्ला यांनी म्हटले की, डबल इंजिन भाजप सरकार सुरक्षा, विकास आणि रोजगारासोबतच नागरिकांना विविध सुविधाही उपलब्ध करून देत आहे. याच भाषणादरम्यान त्यांनी असे काही वक्तव्य केले की, मंचावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील आपले हसू आवरू शकले नाहीत.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे विकास प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान शनिवारी खासदार रवी किशन यांनी एक मजेशीर वक्तव्य केले. त्यांचे भाषण ऐकून मंचावर उपस्थित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही हसू आवरता आले नाही. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रवी किशन यांनी गोरखपूरच्या विकासाबद्दल अभिमान व्यक्त केला. भोजपुरी भाषेत बोलताना ते म्हणाले, ‘हमके लागेला स्पेन, हमके लागेला ई अद्भुत जगह, हमके स्मार्ट सिटी लागेला, काहे कि हम सब जगह देखले हईं’, म्हणजेच, ‘मला हे ठिकाण स्पेनसारखे वाटते. मला हे अद्भुत ठिकाण आणि स्मार्ट सिटीसारखे वाटते, कारण मी अनेक ठिकाणी फिरलो आहे.’ यानंतर त्यांनी मिश्कीलपणे म्हटले, ‘तुम्ही आंधळे असाल तर आम्ही काय करू?’
खासदार रवी किशन शुक्ला यांनी सांगितले की, डबल इंजिन भाजप सरकार सुरक्षा, विकास, रोजगार आणि सुविधांच्या बाबतीत सातत्याने काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विचारसरणी भेदभाव न करता समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याची आहे.
रवी किशन यांनी दावा केला की, उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे निश्चित आहे. तसेच बदलत असलेल्या गोरखपूर आणि उत्तर प्रदेशाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
रवी किशन म्हणाले की, ‘जो तुमचे सर्व दुःख दूर करतो, तोच तुमचा प्रधान, तोच प्रधान सेवक, तोच पंतप्रधान आणि तोच मुख्यमंत्री असतो. हेच रामराज्य आहे.’
ते पुढे म्हणाले की, समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचा, मग तो कोणत्याही समाजाचा किंवा जातीचा असो, सर्वप्रथम विचार केला जाईल आणि त्याला आधी सरकारी योजनांचा लाभ दिला जाईल.
आज सरकार शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांसह प्रत्येक क्षेत्रात गरीबांसाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजवादी पक्षावर निशाणा साधताना रवी किशन म्हणाले की, जनता आता म्हणत आहे की, ‘आम्हाला गुंड-माफिया नकोत. आमच्या जमिनीवर कब्जा होऊ नये. आम्हाला जात-पातीत विभागू नका.’
एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणाचा उल्लेख करत त्यांनी दावा केला की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन होणार असून मोठा विजय मिळणार आहे.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदार रवी किशन शुक्ला आणि कॅबिनेट मंत्री डॉ. संजय निषाद यांच्या मैत्रीवरून दोघांची चांगलीच फिरकी घेतली.
दोन्ही नेत्यांचा पेहराव, खाण्यापिण्याच्या सवयी आणि रामगढताल परिसरातील त्यांच्या घरांचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, दोघांची मैत्री इतकी घट्ट आहे की आता ते सोबत राहण्यापासून, सोबत जेवण्यापर्यंत आणि सोबत शूटिंग करण्यापर्यंतच्या गोष्टी करत आहेत.
मुख्यमंत्री योगींच्या या मिश्कील वक्तव्यावर कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना रोडवेज बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिल्याचा उल्लेख करतानाही मुख्यमंत्री योगींनी रवी किशन यांची मिश्कीलपणे चेष्टा केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी बशारतपूर येथे कल्याण मंडपमसह महानगरपालिका आणि जीडीएच्या १३०.७३ कोटी रुपयांच्या १७० विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
यावेळी ते म्हणाले की, चांगले सरकार असेल तरच चांगली कामे पुढे जातात. चांगले सरकारच युवक, मुली आणि महिलांच्या भविष्याचा योग्य विचार करू शकते. प्रदेश सरकारने आतापर्यंत सुमारे साडेनऊ लाख युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. आगामी एका वर्षात आणखी एक लाख युवकांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सरदार वल्लभभाई पटेल एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग झोन’ तयार केले जात आहेत. येथे युवकांच्या कौशल्याच्या आधारे रोजगाराची हमी देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.