

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्पात केंद्र सरकार अल्प भूधारक शेतकर्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अल्प भूधारक शेतकर्यांसाठी पंतप्रधान कृषी योजनेअंतर्गत एक नवीन उपक्रम सरकार राज्य सरकारच्या सहकार्यातून कृषी जिल्हा कार्यक्रम सुरू करणार आहे. यासाठी देशातील १०० जिल्ह्यांमध्ये धन-धान्य कृषी योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी सीतारमण यांनी सांगितले की, केंद्र सरकार राज्य राज्यांसोबत पंतप्रधान धन धन कृषी योजना हाती घेईल. केंद्र सरकारचे लक्ष्य ग्रामीण तरुण आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या विकासावर आहे. कमी कृषी उत्पादकता, मध्यम पीक आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज असलेल्या १०० जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान कृषी योजनेतंर्गत पीक विविधीकरण, शाश्वत शेती पद्धती, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवणूक वाढवणे, सिंचन सुविधा सुधारणे आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणे याद्वारे कृषी उत्पादकता वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. धन-धान्य कृषी योजनेचा देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वासही अर्थमंत्री सीतारमन यांनी केला.
फळे आणि भाज्यांसाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू करणार आहे. आम्ही उत्पादन वाढवण्यावर तसेच पुरवठा साखळी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. यंदाचा अर्थसंकल्प हा आमच्या आकांक्षांनी प्रेरित होऊन विकासाला गती देण्यासाठी समर्पित आहे. आपली अर्थव्यवस्था सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी आहे. गेल्या १० वर्षांतील आपला विकासाचा संरचनात्मक सुधारणांनी जागतिक लक्ष वेधले आहे. भारताच्या क्षमता आणि क्षमतेवरील विश्वास वाढला आहे. पुढील ५ वर्षे सर्वांचा विकास साध्य करण्यासाठी, सर्व क्षेत्रांच्या संतुलित विकासाला चालना देण्यासाठी एक अद्वितीय संधी आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.