

udhayanidhi stalin release after questioning today madras high ourt irects police
पुढारी ऑनलाईन : पोलिसांनी चेन्नईतील नीलांकरई येथे असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यासोबत डीएमकेच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांना तंजावूर येथे नेण्यात आले.
तमिळनाडूमधील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने तमिळनाडू पोलिसांना आज चौकशी केल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोर्टाने उदयनिधी स्टॅलिन यांना स्टेशन बेल देण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच, गरज भासेल तेव्हा उदयनिधी स्टॅलिन यांनी तपासात सहकार्य करावे, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
उदयनिधी स्टॅलिन कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या वादावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जमावाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर निशाणा साधला आणि तामिळनाडूसाठी कावेरीच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.
तामिळनाडूच्या राजकारणात उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्टॅलिन यांना अटक केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर उदयनिधी स्टॅलिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, "आम्ही या सरकारविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे. आंदोलनादरम्यान मी जवळपास २२ मिनिटे भाषण केले. या सरकारने शेतकऱ्यांची प्रत्येक प्रकारे फसवणूक कशी केली, हे मी सविस्तरपणे सांगितले. निवडणुकीदरम्यान दिलेले एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही आणि शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचाही सन्मान केला नाही."
ते पुढे म्हणाले की, "हे कमकुवत आणि कणाहीन सरकार मेकेदाटू धरणाच्या बांधकामाविरोधात आवाज उठवू शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलायला हवे होते. आंदोलनात मी सांगितले होते की, द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि आमचे नेते नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. मात्र, या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी सरकार आता जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे."
"मी कालही म्हटले होते की, हे टीव्हीके सरकार केवळ लक्ष विचलित करण्याचे राजकारण करते. जेव्हा जेव्हा एखादा मोठा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा हे सरकार जनतेचे लक्ष दुसऱ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करते."
डीएमके नेत्याने पुढे म्हटले की, "डमी मुख्यमंत्री दररोज रील पोस्ट करत असतात. फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर मंत्री आणि आमदारही जणू रीलच्या दुनियेतच जगत आहेत. शासन चालवण्याऐवजी त्यांना रील बनवण्याचे वेड लागले आहे. मी याच गोष्टीवर टीका केली होती."
उदयनिधी म्हणाले की, "आता या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी मी अशा काही गोष्टी बोललो, ज्या मी कधीच बोललो नाही, असा खोटा दावा केला जात आहे. त्यांनी कट-कॉपी-पेस्टचे राजकारण स्वीकारले आहे आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सत्तेत आल्यानंतर या पक्षाने जर कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवले असेल, तर ते म्हणजे कॉपी-पेस्ट करणे, बनावट रील तयार करणे आणि चुकीची माहिती पसरवणे. हीच या सरकारची सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे."
"याच मालिकेचा भाग म्हणून आता माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून आज मला अटक करण्यात आली आहे. मात्र, अशा कारवाईला मी घाबरणार नाही. माझे राजकीय संस्कार कलैग्नर यांच्या परंपरेत आणि डीएमकेमध्ये झाले आहेत. केवळ मीच नाही, तर डीएमकेचा शेवटचा कार्यकर्ताही अशा अटकेला घाबरणार नाही. आम्ही ही लढाई कायदेशीर मार्गाने लढू. आम्ही या सरकारविरोधात आमचा निषेध नोंदवला आहे."
काय आहे प्रकरण?
उदयनिधी स्टॅलिन कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या वादावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जमावाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर निशाणा साधला आणि तामिळनाडूसाठी कावेरीच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.
याचदरम्यान जमावातील काही लोकांनी "तृषा, तृषा" अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. सांगितले जात आहे की, त्यावेळी स्टॅलिन यांनी जमावाला तृषाच्या घोषणा का दिल्या जात आहेत, असा सवाल केला. याचदरम्यान त्यांनी द्विअर्थी वक्तव्य केल्याचा आणि अश्लील हावभाव केल्याचा आरोप आहे.