

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी (दि.११) जम्मू आणि काश्मीरमधील दोन गटांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत पाच वर्षांसाठी बंदी घातलेल्या संघटना म्हणून घोषित केले. उमर फारूख यांच्या नेतृत्वाखालील अवामी कृती समिती (एएसी) आणि मसरूर अब्बास अन्सारी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन (जेकेआयएम) या दोन संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे.
यासंबंधीच्या अधिसूचनेत केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले की, ‘एएसी’ आणि ‘जेकेआयएम’ या दोन्ही संघटनांचे सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवादी कारवायांना आणि भारतविरोधी प्रचाराला पाठिंबा देत आहेत. या संघटना देशाच्या अखंडतेला, सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदेशीर कारवायांमध्ये देखील सहभागी आहे. उपलब्ध सर्व तथ्ये लक्षात घेता गृह मंत्रालयाने दोन्ही गटांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत पाच वर्षांसाठी बेकायदेशीर घोषित केले आहे, असे अधिसूचनांमध्ये म्हटले आहे.