

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाच्या अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पूर, नदी-नाल्यांना आलेले उधाण आणि रस्ते खचण्याच्या घटनांमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर येथे शाळेतून घरी परतणारी तीन मुले घोंघा नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली. रविवारी तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात पावसामुळे १९ जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ९२ गावांतील पिके पाण्याखाली गेली असून २६ गावांचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेच्या वाढत्या पाणीपातळीमुळे घाट जलमय झाले असून, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. वाराणसीतील सर्व ८४ घाट पाण्याखाली गेले आहेत.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातही पावसाचा जोर कायम आहे. सीधी जिल्ह्यात तब्बल १०४ कोटी रुपये खर्चून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या रस्त्याचा मोठा भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. सतना येथे दुचाकीसह तिघे नाल्यात वाहून गेले. त्यापैकी दोघांनी पोहत जीव वाचवला, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. पन्ना जिल्ह्यात उफाळलेल्या नदीत डंपर वाहून गेल्याची घटना घडली.
ओडिशा, हिमाचल प्रदेश
ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक घरे कोसळली असून हजारो कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली आहेत. हिमाचल प्रदेशातही पावसाचा फटका बसला असून, मणिमहेश यात्रा २३ आणि २४ ऑगस्ट रोजी स्थगित करण्यात आली आहे.