पुढारी ऑनलाईन डेस्क : विविध राज्य सरकारांकडून होत असलेल्या बुलडोझरच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने आज ( दि. २) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ आरोपी आहे म्हणून कोणी एखाद्याचे घर उद्ध्वस्त करू शकतो का? एखादा आरोपी जरी दोषी ठरला तरी त्याचे घर विहित कायद्याशिवाय नष्ट करता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे.
आम्ही संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचा विचार करत आहोत, असेही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाची सुनावणी 17 सप्टेंबर रोजी होणार होती. बुलडोझरच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत अशा प्रकारची कारवाई राज्य सरकारांना अंदाधूंदपणे करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.