नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (युजीसी-नेट) रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ( दि. १२) फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
नेट-युजीसी परीक्षा १८ जूनरोजी घेण्यात आली होती. आणि १९ जूनरोजी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता ही परीक्षा २१ ऑगस्टरोजी होणार आहे. याचिकेत परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. आता २ महिने उलटले आहेत. सध्याच्या टप्प्यावर या याचिकेवर विचार केल्याने केवळ अनिश्चितता वाढेल, असे न्यायालयाने नमूद केले. ९ लाख परीक्षार्थी २१ ऑगस्टरोजी परीक्षेला बसतील आणि अशा प्रकारे या टप्प्यावर, रद्द करण्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले.
याचिका विद्यार्थ्यांनी नाही, तर वकिलाने दाखल केल्याचे लक्षात घेऊनही खंडपीठाने याचिका फेटाळून लावली. दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटीचे आरोप आणि नेट परीक्षेतही पेपरफुटी झाल्याच्या चर्चा लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.