Sonam Wangchuk : विचार इतका संकुचित झालांय का? सोनम वांगचुक यांनी कोणाला दिला विचार बदलण्याचा सल्ला..

सोनम वांगचुक यांच्यावर कशावरून होत आहे टीका..
Sonam Wangchuk
विचार इतका संकुचित झालांय का? सोनम वांगचुक यांनी कोणाला दिला विचार बदलण्याचा सल्ला..file photo
Published on
Updated on

sonam wangchuk reply to trollers on praising vande bharat and delhi srinagar railway route

पुढारी ऑनलाईन : दिल्ली ते श्रीनगर हा प्रवास वंदे भारत ट्रेनने केल्यानंतर सोनम वांगचुक यांनी भारतीय रेल्वेचे कौतुक केले होते. त्यांनी हा अनुभव शानदार असल्याचे सांगितले. मात्र, अनेकांनी याचा अर्थ मोदी सरकारचे कौतुक असा घेत त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

केंद्र सरकारला आपल्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडण्यासाठी २६ दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आता आपल्या घरी लडाखमध्ये पोहोचले आहेत. एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना वांगचुक यांनी आपली विचारसरणी बदलण्याचा सल्ला दिला आहे. विचारसरणी इतकी संकुचित नसावी आणि चुकीला चूक म्हटले पाहिजे. मात्र, एखादी गोष्ट चांगली असेल तर तिचे कौतुकही केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

वंदे भारतच्या प्रवासाचे केले होते कौतुक

उपोषण सोडल्यानंतर गुरुग्राममधील रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी पहिल्यांदाच ट्रेनने दिल्ली ते श्रीनगर प्रवास केला. वंदे भारत ट्रेन आणि या रेल्वे मार्गावरील आपला अनुभव त्यांनी शानदार असल्याचे सांगितले. तसेच भारतीय रेल्वेचा अभिमान असल्याचेही म्हटले.

मात्र, मोदी सरकारच्या काळात तयार झालेल्या वंदे भारत ट्रेनचे आणि या रेल्वे मार्गाचे कौतुक करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजप सरकारचे कौतुक करणे, असा अर्थ अनेकांनी काढला. त्यानंतर वांगचुक यांच्यावर टीका होऊ लागली.

Sonam Wangchuk
LPG price: मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोनम वांगचुक यांनी विचारले- विचार इतका संकुचित झाला आहे का?

लडाखमधील आपल्या गावातून व्हिडीओ शेअर करत सोनम वांगचुक यांनी अशा टीकाकारांना उत्तर दिले. त्यांनी लोकांच्या विचारसरणीला संकुचित म्हटले.

वांगचुक म्हणाले, "काल येताना मी सांगत होतो की, काश्मीरपर्यंत रेल्वे पोहोचवण्यासाठी जे अभियांत्रिकीचे काम झाले आहे, त्याचा मला भारतीय रेल्वेवर अभिमान आहे. यावरही काही लोक नाराज होते की मी सरकारचे कौतुक करत आहे. आपली नजर इतकी संकुचित झाली आहे का की भारतातील एखादा विभाग... उदाहरणार्थ, इस्रोने मंगळावर अंतराळवीर उतरवला, तरी आपण त्याचे कौतुक करणार नाही का? अरे, भारतीय रेल्वे ही भारताची रेल्वे सेवा आहे. हजारो अभियंत्यांनी मिळून ही रेल्वे मार्गिका तयार केली आहे. आपण तिचे कौतुक करू नये का?"

चुकीला चूक आणि योग्य गोष्टीला योग्य म्हणा

सोनम वांगचुक यांनी अशा लोकांना आपली विचारसरणी बदलण्याचा सल्ला दिला. चुकीला चूक म्हणण्यासोबतच जिथे काही चांगले दिसते, तिथे त्याचे कौतुकही केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, "मन आणि विचार खुले ठेवा. तुम्ही कोणत्याही बाजूचे असा, सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधकांचे... आपल्याला मिळून भारत घडवायचा आहे. जिथे काही चुकीचे घडते, तिथे त्याला चूक नक्की म्हणा. पण एखादी गोष्ट योग्य असेल तर तिचे कौतुकही करा. या बाजूचेही होऊ नका आणि त्या बाजूचेही होऊ नका. तुम्हाला कोणाचेही अंधभक्त बनायचे नाही. चुकीला चूक आणि योग्य गोष्टीला योग्य म्हणायचे आहे. काही चांगले घडले असेल तर त्याचे कौतुकही करा."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news