

नवी दिल्ली : एप्रिल २०२६ पासून महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला (एसआयआर) सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेशी संबंधित तयारीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.
महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादर आणि नगर हवेली, दमण- दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, दिल्ली, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड या २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून तयारी करण्याचे निर्देश दिले.
पत्रात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी २४ जून रोजी संपूर्ण देशात एसआयआर राबवले जाईल असा आदेश दिला होता.दरम्यान, बिहारनंतर देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २८ ऑक्टोबर २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत मतदार यादी अद्ययावत केली जात आहे. नवीन मतदारांची नावे जोडली जात आहेत तसेच नावे वगळली जात आहेत आणि मतदार यादीतील चुका सुधारल्या जात आहेत.