पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात बागेश्वर धामला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर आज ( दि.२० ऑगस्ट) पहाटे काळाने घाला घातला. राष्ट्रीय महामार्ग ३९ वर काडारीजवळ घडलेल्या भीषण पघातात सात जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
छतरपूर रेल्वे स्थानकावरून बागेश्वर धामकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी आणि मृतांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
छतरपूर स्थानकावर उतरून मोठ्या संख्येने भाविक ऑटो रिक्षाने बागेश्वर धामकडे जात होते. ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे १५ प्रवासी हाोते. महामार्गावर ऑटो रिक्षाने ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती ही जागीच पाच भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, बागेश्वर धामला जाताना व येताना गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे या दुर्घटना होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.