नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारात महाराष्ट्रातील यवतमाळ आणि पुणे या जिल्ह्यातील विविध संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली असून या दोन्ही जिल्ह्यांमधील संस्थांची निवड झाली आहे. या पुरस्कारांचे वितरण २२ ऑक्टोबरला दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केले जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने ३८ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. हे पुरस्कार नऊ विविध श्रेणींमध्ये प्रदान करण्यात येतील. यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा-महाविद्यालये, उद्योग, पाणी वापरकर्ता संघ आणि नागरी संस्थांचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक ओडिशाला, दुसरे उत्तर प्रदेशला तर गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सर्वोत्कृष्ट उद्योगाच्या श्रेणीत तिसरे पारितोषिक जाहिर झाले आहे. तसेच पुण्यातील भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला सर्वोत्कृष्ट नागरी संस्थांच्या श्रेणीत पहिले स्थान प्राप्त झाले आहे. पुणे महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत तिसरे पारितोषिक जाहीर आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून राज्यातील पाणी व्यवस्थापन व संरक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या उत्कृष्ट कामगिरीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.