

rudraprayag kedarnath yatra temporarily suspended due to heavy rains after alert by imd
पुढारी ऑनलाईन : हिंदूंमध्ये चारधाम यात्रेला अनण्यसाधारण महत्व आहे. यंदाच्या वर्षी अक्षय तृतीयेला यात्रेला सुरूवात झाली होती. त्यामुळे भाविकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. मात्र येथील बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे याचा यात्रेवर परिणाम होत असतो.
हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळाची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन केदारनाथ धामाकडे जाणाऱ्या भाविकांना विविध टप्प्यांवर आणि होल्डिंग क्षेत्रांमध्ये थांबवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान विभागाने जारी केलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील विविध डोंगराळ भागांत सतत पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत अतिवृष्टी, वेगवान वारे आणि वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे केदारनाथ धामाकडे जाणाऱ्या भाविकांना विविध ठिकाणी थांबवून सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पायी जाणाऱ्या यात्रेकरूंनाही सुरक्षित स्थळी हलवले
पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना देखील जवळच्या सुरक्षित ठिकाणी आणि निश्चित करण्यात आलेल्या होल्डिंग क्षेत्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच श्रीनगर परिसरातून केदारनाथकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूकही सध्या थांबवण्यात आली आहे. हवामान सुधारत नाही तोपर्यंत सर्व वाहने निश्चित ठिकाणी उभी करण्यात येत आहेत, जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता येईल.
पुढे जाण्याची परवानगी कधी मिळणार?
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हवामानात सुधारणा झाल्यानंतर आणि संपूर्ण यात्रा मार्ग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच भाविकांना आणि वाहनांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
भाविक आणि वाहनचालकांना प्रशासनाचे आवाहन
अधिकाऱ्यांनी भाविक आणि वाहनचालकांना प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्ण सतर्कतेने आणि दक्षतेने यात्रा व्यवस्थापनाचे काम करत असून कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेपासून यात्रेला सुरुवात
चारधाम यात्रेची सुरुवात 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे कपाट उघडून झाली होती. केदारनाथ मंदिराचे कपाट 22 एप्रिल रोजी उघडण्यात आले होते. यात्रा सुरू झाल्यापासून केदारनाथसह बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे.