नवी दिल्ली : देशातील ३० आंतरराजीय नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीची तयारी सुरु झाली आहे. लोकसभेत एका लिखीत प्रश्नाच्या उत्तरावर जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. यामध्ये महाराष्ट्रातील २ आंतरराजीय प्रकल्पांचा समावेश आहे. तर २० राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, यांपैकी काही प्रकल्पांना रद्द करण्यात आले आहे. देशातील ३० नदीजोड प्रकल्पांपैकी २४ प्रकल्पांची व्यवहारता रिपोर्ट (एफआर) आणि ११ तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २ आंतरराजीय नदीजोड प्रकल्प आणि १ राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार आहे.
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि भास्कर भगरे यांनी महाराष्ट्रासह देशातील नदीजोड प्रकल्पाविषयी लिखीत प्रश्न विचारला. यावर जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, दमनगंगा-पिंजळ नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला पाणीपुरवठा सुरळित होईल. पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाचाही डीपीआर तयार आहे. हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील आंतरराजीय आहेत.
महाराष्ट्रातील राज्यांतर्गत वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले. याव्यतिरीक्त कृष्णा-भीमा, दमनगंगा-गोदावरी, वैतरणा – गोदावरी, दमनगंगा-वैतरणा-गोदावरी, कोयना-मुंबई सिटी, गोदावरी-पूर्णा-मांजरा, कोयना -नीरा, मुळशी-भीमा, सावित्री-भीमा, कृष्णा-भीमा, जळगाव जिल्ह्यातील तापी नदीजोड, नर्मदा-तापी या प्रकल्पांचा पीएफआर तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
वैनगंगा-मांजरा, पातळगंगा-गोदावरी, सावित्री-कुंडलिका-भीमा, नार-पार-गिरना, तापी-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प व्यावहारिक नसल्याचे सरकारने सांगितले. तर वैनगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने रद्द केल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.