

नवी दिल्ली ः 27 वर्षांनंतर भाजपने दिल्लीवर हुकूमत प्रस्थापित केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा सुफडा साफ झाल्याने भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. याच बरोबर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) देशातील 19 राज्यांत सरकार स्थापन झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्या टर्ममध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर देशात 8 राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप आणि रालोआला पाच राज्यात सत्ता मिळाली आहे. आंध्र प्रदेश,अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र या पाच राज्यांत भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. सिक्कीम,जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना पराभव पत्कारावा लागला. दिल्ली विधानसभेतील विजयामुळे भाजप आणि रालोआची सत्ता असणार्या राज्यांची संख्या 19 झाली आहे.
2018 साली भाजप आणि रालोआला देशातील 21 राज्यांमध्ये सत्ता प्राप्त झाली. यामुळे रालोआने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेस राजवटीचा विक्रम मोडीत काढला होता. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये सत्ता मिळाल्यामुळे त्यावेळी रालोआला 21 राज्यात सत्ता मिळाली होती. हिमाचल आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाली असती तर रालोआची सत्ता असणार्या राज्यांची सत्ता 21 झाली असती.