

नवी दिल्ली : ‘देशाचा युवक देशाचा आधारस्तंभ आणि भविष्य आहे. देशाला नव्या उंचीवर नेण्याची क्षमता आपल्या देशातील युवकांमध्ये आहेत. देशातील तरूणाईसाठी आज कामासाठी अनेक क्षेत्र आणि संधी आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात उत्तम काम करा,’ असा प्रेरणादायी संदेश क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival 2025) निमित्ताने दिल्लीत आलेल्या महाराष्ट्रातील युवकांना दिला.
क्रिडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या युवकांना रक्षा खडसे यांनी अनौपचारिक चर्चेला निमंत्रित केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या युवकांचे त्यांनी अभिनंदन केले आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित युवकांचे कार्यक्रमासंबंधी अनुभव जाणून घेतले आणि चर्चेनंतर त्यांच्यासोबत स्नेहभोजनही केले.
युवकांसोबत झालेल्या चर्चेत बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, देशातील युवकांमध्ये मोठी क्षमता आहे आणि या क्षमतेला प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्वाखाली होत आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय यामध्ये कार्यरत आहे. युवा पिढीच्या कार्यक्षमतेला योग्य दिशा आणि संधी दिल्यास ते देशाला विकसित भारत बनवण्याच्या मार्गावर नेऊ शकतात. आपले विचार, संकल्पना, आणि कार्य हे केवळ स्वतःच्या उन्नतीसाठी नव्हे, तर समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी असले पाहिजेत. म्हणूनच आजच्या तरुणांनी नेतृत्व कौशल्य विकसित करून सामाजिक आणि राष्ट्रीय परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.
कार्यक्रमानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी युवकांनी रक्षा खडसे यांची स्वाक्षरी त्यांच्याकडे असलेल्या डायरीमध्ये नोंदवून घेतली. क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीत येता आले. पंतप्रधान, वेगवेगळे मंत्री, इंडिया गेट, भारत मंडपम, महाराष्ट्र सदन अशा व्यक्ती आणि वस्तू ज्यांना केवळ माध्यमांच्या द्वारे बघू शकतो, ते प्रत्यक्ष अनुभवता आले. हा अनुभव आयुष्यभर संस्मरणीय आहे. हा अनुभव ज्या मंत्रालयाच्या माध्यमातून मिळाला त्या खात्याच्या राज्यमंत्री महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याची आठवण म्हणून मंत्री रक्षा खडसे यांची स्वाक्षरी घेतल्याच्या भावना उपस्थित युवकांनी बोलून दाखवल्या.