नवी दिल्ली : राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसून आले. अमित शहा यांच्या हस्तक्षेपानंतर मात्र काँग्रेसला नमते घ्यावे लागले. राज्यसभेत काँग्रेसचे एक खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप एका भाजपच्या खासदाराने केला. त्यामुळे सभागृहात काही काळ चांगलेच वातावर तापले होते.
वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू होती. यावेळी काँग्रेसचे कर्नाटकमधील खासदार नासिर हुसेन यांचा उल्लेख करत भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी एक वक्तव्य केले. अग्रवाल म्हणाले की, नासीर हुसेन जेव्हा राज्यसभेची निवडणूक जिंकले तेव्हा कर्नाटक विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या आणि या गोष्टीला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांना तुरुंगात टाकले होते. दरम्यान, अग्रवाल यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी बाकांवरील काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ सुरू केला. तेव्हाच सभागृहात काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी अग्रवाल यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत सभापतींना कुठलीही पूर्वसूचना न देता एक सदस्य दुसऱ्या सदस्यावर मानहानीकारक किंवा तत्सम आरोप करू शकत नाही. अशा पद्धतीने आरोप करणे हे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे आहे, असे प्रमोद तिवारी म्हणाले.
राज्यसभेत हा प्रकार सुरु असताना गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला आणि काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांना चोख प्रत्युत्तर दिले. खासदार अग्रवाल यांनी नासिर हुसेन यांच्यावर व्यक्ती म्हणून कोणताही आरोप केलेला नाही. ते निवडून आल्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केले. हुसेन निवडून आल्यानंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या, एवढेच वक्तव्य अग्रवाल यांनी केले. यात आरोप कुठेही नाही, असेही शहा म्हणाले.