

Kiren Rijiju slams Rahul Gandhi over national security
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (दि.१८) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा भारतविरोधी शक्तींशी संबंध असल्याचा आरोप केला. राहुल गांधी हे भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक व्यक्ती असल्याचा आरोप त्यांनी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रिजिजू यांनी राहुल गांधींच्या विविध बैठकांवर प्रश्न उपस्थित केले आणि आरोप केला की विरोधी पक्षनेते त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये आणि देशात नक्षलवादी, अतिरेकी, विचारवंत आणि जॉर्ज सोरोस सारख्या लोकांना भेटत राहतात, असे त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले की, काँग्रेसचे काम फक्त संसदेत गोंधळ घालणे आहे. काँग्रेस म्हणते की, आम्ही त्यांना बोलू देत नाही. पण जसे राहुल गांधी संसदेत येतात, गोंधळ, बॅनर आणि घोषणाबाजी सुरू होते. समाजवादी पक्षही असेच करतो पण त्यांच्याशी बोलता येते. आम्ही समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि अगदी द्रमुकच्या नेत्यांसोबतही चांगले काम करू शकतो. राहुल गांधींच्या वागणुकीमुळे छोट्या विरोधी पक्षांना आणि खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. ते त्यांच्या भागातील प्रश्न मांडू शकत नाहीत, असा दावाही रिजिजू यांनी केला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील प्रस्तावावर, किरेन रिजिजू म्हणाले की, अध्यक्षांचे काम कामकाज चालवणे, सरकारी काम पुढे नेणे आणि विरोधी खासदारांना बोलण्याची संधी देणे हे आहे. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष अध्यक्षांच्या दालनात घुसले आणि निदर्शने केली. तरी देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संयम आणि नम्रता दाखवली. जर सोमनाथ चटर्जी अध्यक्ष असते, तर कदाचित त्यांनी सर्वांना निलंबित केले असते, असे ते म्हणाले.