

नवी दिल्ली : कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरुस्ती, देखभाल आणि नूतनीकरण करण्यासाठी, कोळी बांधवाना अनुदान देण्यासाठी तसेच मुंबई पोलिस दलाला आधुनिक शस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना केली.
२०२४-२०२५ च्या पुरवणी मागण्यांवर लोकसभेत चर्चा झाली. या पुरवणी मागण्यांवर बोलताना खा. रविंद्र वायकर यांनी मुंबई, महाराष्ट्रासह आपल्या लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे काही विषय मांडत निधीची मागणी केली. यात मुंबई विमानतळावर नवी धावपट्टी, विमानतळाचा विस्तार करणे, मुंबईत विशेष न्यायालय उभारणे, मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्र देण्यासाठी राज्य सरकारला निधी देण्यात यावा, सागरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी जवळील सगळ्या बंदरांचा विकास करणे, मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणे, कोकण रेल्वेच्या स्थानकाची दुरुस्ती, देखभाल तसेच नूतनीकरण करणे, मुंबई व कोकणातील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना अनुदान देण्यात यावे तसेच मुंबईत नवीन रुग्णालय आणि जुन्या रुग्णालयाच्या देखभाल दुरस्तीसाठी निधी देण्यात यावा, अशीही मागणी खा. वायकर यांनी लोकसभेत केली.