नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये (Budget 2024) महाराष्ट्राला दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त केला. यावेळी खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारचा निषेध केल्यानंतर बोलताना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, मला वाटते या अर्थसंकल्पाला 'प्रधानमंत्री सरकार बचाओ योजना' म्हणायला हवे. कारण त्यांना हे कळून चुकलंय की, पुढची ५ वर्षे या सरकारला वाचवायचे असेल, तर त्यांना त्यांच्या साथीदारांची काळजी घ्यावी लागेल. केंद्राकडून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Budget 2024)
यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शिवाजी काळंगे, बळवंत वानखडे, शिवसेना (उबाठा) च्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे उपस्थित होते. तसेच सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. (Budget 2024)