

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कोव्हिड-19 साथीनंतर भारतात संसर्गजन्य रोगांचा पुन्हा एकदा वाढलेला धोका चिंताजनक आहे. जागतिक स्तरावर 70 लाखांहून अधिक बळी घेणार्या या महामारीने लोकांच्या रोगप्रतिकारशक्तीला कायमस्वरूपी हानी पोहोचवली असून, त्यामुळे इतर अनेक जीवघेण्या संसर्गांचा धोका वाढला आहे. कोव्हिडनंतर म्युकरमायकोसिससारख्या रोगाने डोके वर काढले, ज्यात 40,824 हून अधिक नागरिक बाधित झाले आणि 3,229 हून अधिक लोकांचा बळी गेला.
कोव्हिड-19 नंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने संसर्गजन्य रोगांमध्ये वाढ
ब्लॅक फंगस, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या रोगांचा मोठा उद्रेक
क्षयरोग आणि एन्सेफलायटिस या जुन्या समस्या कायम
केरळमध्ये ‘ब्रेन-ईटिंग अमिबा’मुळे होणार्या P-M² चे मोठे संकट
कोव्हिडनंतर डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या डासांमुळे होणार्या आणि पाण्यामुळे पसरणार्या रोगांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आणला आहे. 2024 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आणि 1,200 हून अधिक मृत्यू झाले. केरळमध्ये लेप्टोस्पायरोसिसच्या 2,442 संशयित रुग्णांची आणि 158 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे, जी गेल्या दशकाच्या सरासरीपेक्षा 10 पट जास्त आहे.
भारतातील जुनाट समस्या असलेला क्षयरोग अजूनही दरवर्षी लाखो लोकांचा बळी घेत आहे. भारताचा जागतिक क्षयरोगाच्या बळात 26-27 टक्के वाटा आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये एन्सेफलायटिसचा प्रादुर्भाव अनेक वर्षांपासून कायम आहे, ज्यामुळे प्रामुख्याने लहान मुलांना लक्ष्य केले जात आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, 2025 मध्ये केरळमध्ये ‘प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ या दुर्मीळ पण अत्यंत प्राणघातक आजाराचा उद्रेक झाला आहे. नेगलेरिया फाऊलेरी नावाच्या ‘ब्रेन-ईटिंग अमिबा’मुळे होणार्या या संसर्गाचे केरळमध्ये 69 रुग्ण आणि 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशभरात 72 रुग्ण आणि 19 मृत्यू झाले आहेत. उबदार गोड्या पाण्यातून नाकाद्वारे मेंदूत प्रवेश करणार्या या रोगाचा जागतिक मृत्यू दर 95-98 टक्के आहे. केरळमध्ये 2020 मध्ये 29 रुग्ण आणि 24 वाचलेले असताना 2025 मध्ये मात्र मृत्यू दरात वाढ झाली आहे.