

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पाकव्याप्त (पीओके) काश्मीरमधील लोक भारतात सामील होण्याची मागणी करतील, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. पाकिस्तान पीओके भारताला सोपवेल अशी अपेक्षा नाही. मात्र, पीओकेचे लोक स्वतःच त्यांना भारतात सामील करून जम्मू आणि काश्मीरमध्ये विलीन करण्याची मागणी करतील, असे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षणमंत्र्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे.
संरक्षणमंत्री म्हणाले की, ज्या पद्धतीने भारताचा आर्थिक विकास सतत होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा वेगाने वाढली आहे. ते पाहून पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनाही हे समजू लागले आहे की, जर आपल्याला आपला विकास हवा असेल तर आपण भारतासारख्या देशात सामील होऊनच आपल्या प्रदेशाचा विकास करू शकतो. राजनाथ सिंह म्हणाले की, पीओकेला देश नाही, तर एक प्रदेश आहे. जर पीओकेच्या लोकांनी भारतात सामील होण्याची मागणी केली. तर पाकिस्तानला तसे करावे लागेल. यासाठी पीओकेला पाकिस्तानची संमती का लागेल? असे ते म्हणाले.
बांगलादेशातील परिस्थितीबद्दल विचारले असता, संरक्षणमंत्री म्हणाले की, भारत नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखू इच्छितो. बांगलादेश देखील आपला शेजारी देश आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करतो. कारण आपले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे की, आपण मित्र बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या शेजारी बांगलादेशशी चांगले संबंध राखायचे आहेत.