

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. तर पुढील महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, दिल्लीत विविध विकासाकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. तर काँग्रेस पक्ष राजधानीत म्हणावा तेवढा मजबूत नाही. त्याबरोबरच काँग्रेसकडे दिल्लीतील स्थानिक प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. दरम्यान, शुक्रवारी दिल्ली भाजपने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘दिल्ली चली मोदी के साथ’. तसेच या अगोदरही पक्षाने ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावर लढण्याचे संकेत दिले होते. आता हे संकेत खरे ठरत असून भाजप ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या आम आदमी पक्षाच्या आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांच्या पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे. आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सांगितले होते की, पुन्हा केजरीवाल यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे ‘आप’ माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणार हे तेव्हाच स्पट झाले होते. त्यावर केजरीवाल यांनी योजनांच्या घोषणा करुन शिक्कामोर्तब लावला. सध्या केजरीवाल आम आदमी पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत.
दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पक्षाने त्यांना सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सचदेवा दिल्लीतील निवडणूक व्यवस्थापनाचे नेतृत्व करणार आहेत. यापूर्वी अशी चर्चा होती की, सचदेवा आम आदमी पक्षाच्या (आप) कोणत्यातरी मोठ्या चेहऱ्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. तर भाजप दिल्लीत तिकीट वाटपावर विचारमंथन करत आहे. यावेळी पक्ष अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई आहे. मात्र, दिल्लीत भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस नसून आम आदमी पक्ष आहे. तर काँग्रेस पक्ष म्हणावा तेवढा मजबूत नाही. काँग्रेसच्या शीला दीक्षीत मुख्यमंत्री होत्या तेव्हा पक्षाला राजधानीत चांगले दिवस होते. मात्र, अलीकडच्या दशकात काँग्रेसची राजधानीतील अवस्था बिकट झाली आहे. सध्याच्या विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार नाही. काँग्रेसची मतपेटी आम आदमी पक्षाकडे गेली आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेस मजबूत होणे भाजपच्या फायद्याचे असल्याचे बोलले जाते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पुढील घोषणा करण्याची शक्यता आहे.
· ३०० युनिटपर्यंत वीज मोफत
· महिलांसह, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत बससेवा
· महिलांसाठी लाडली बहिण योजना
· गरिबांना मोफत उपचार
· २० हजार लीटर स्वच्छ पाणी मोफत
· जिथे झोपडी तिथे घर योजनेची घोषणा