

नवी दिल्ली : दिल्लीत आता एकच आवाज गुंजतोय, आम्ही 'आप'दा' सहन करणार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला. तसेच दिल्लीला विकासाचा प्रवाह हवा आहे आणि भाजप सेवेच्या भावनेने काम करणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करणारा पक्ष आहे. दिल्लीला जगातील २० शहरांपैकी एक बनवण्याचा आमचा संकल्प आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
राजधानी दिल्लीत निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि दिल्ली विधानसभेत विरोधात असलेल्या भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रोहिणी परिसरात दिल्ली भाजपच्या वतीने आयोजित परिवर्तन सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला लक्ष्य केले.
पंतप्रधानांनी रविवारी जनकपुरी ते कृष्णा पार्क दरम्यान बाराशे कोटी रुपये खर्चाच्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याचे च्या २.८ किमीच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील २६.५ किमीच्या रिठाला-कुंडली दरम्यानच्या कामाची पायाभरणीही केली. यासाठी ६ हजार २३० कोटी रुपये खर्च येईल. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी साहिबााबाद आणि न्यू अशोक नगर दरम्यान दिल्ली-गाझियाबाद-मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या १३ किमी लांबीच्या भागाचे उद्घाटनही केले होते.
दिल्लीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपला संधी देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. पंतप्रधान म्हणाले की, राजकारणात धोरण, हेतू, निर्णय आणि निष्ठा खूप महत्त्वाची असते, मात्र काही लोकांवर कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप आहेत. मद्य धोरण गैरव्यवहाराशी ही लोक संबंधित आहेत. प्रदूषणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. जेव्हा हेतूंमध्ये दोष असतो आणि निष्ठा जनतेप्रती नसते तेव्हा असे कृत्य घडते, असे म्हणत त्यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली आणि सत्ताधाऱ्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे, त्यामुळे ते व्यथित झाले आहेत, अशी टीकाही काही पंतप्रधान मोदींनी केली.
भाजप सरकार आल्यास दिल्लीत लोकहिताची कोणतीही योजना बंद केली जाणार नाही, असे आश्वासन दिल्लीच्या जनतेला देत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले तसेच आजवर ज्या योजना केवळ कागदावर राहिल्या त्यांचीही अंमलबजावणी करण्यात येईल. दिल्लीत सर्व वर्गांची काळजी घेतली जाईल आणि डबल इंजिन असलेले सरकार दिल्लीच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, असेही आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशभरातील करोडो कुटुंबांना मोफत उपचार मिळत आहेत. कोट्यवधी वृद्धांना मोफत उपचार मिळणार हे निश्चित झाले आहे, मात्र दिल्लीतील सत्ताधारी आयुष्यमान भारत योजना येथे लागू होऊ देणार नाही, यावर ठाम आहे. सरकार आल्यास ही योजना देखील प्रभावीपणे लागू करण्यात येईल, असेही पंतप्रधान म्हणाले.