PM Modi talk with Shubhanshu Shukla | भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक उभारावेच लागेल - पंतप्रधान मोदी; वाचा शुभांशु शुक्लांसोबतचा संपूर्ण संवाद...

PM Modi talk with Shubhanshu Shukla | देशाचा ध्वज अंतराळ स्थानकात फडकावल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी मानले शुभांशु यांचे आभार
PM Narendra Modi - Shubhanshu Shukla
PM Narendra Modi - Shubhanshu ShuklaPudhari
Published on
Updated on

PM Modi live talk with Group captain Shubhanshu Shukla at ISS

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना जागतिक अंतराळ स्थानकावर (ISS) तिरंगा फडकवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. "तुम्ही आपल्या मातृभूमीपासून दूर असलात तरीही तुम्ही प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहात," असे पंतप्रधानांनी शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधताना म्हटले. दरम्यान, भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक उभारावेच लागेल, असेही या संवादावेळी मोदींनी स्पष्ट केले.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय असून इतिहास रचणारे अंतराळवीर आहेत. पंतप्रधानांनी त्यांची तब्येत विचारत संवाद सुरु केला. जाणून घेऊया हा संपूर्ण संवाद...

140 कोटी भारतीयांचे भावविश्व....

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सध्या फक्त आपण दोघंच बोलत आहोत, पण माझ्यासोबत 140 कोटी भारतीयांचं भावविश्व देखील आहे. माझ्या आवाजामध्ये संपूर्ण भारताचा उत्साह आणि आनंद भरलेला आहे. तुम्ही अंतराळात आपला झेंडा फडकवत आहात, याबद्दल मी तुम्हाला मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. तिथे सगळं ठिक आहे ना? तुमची तब्येत ठीक आहे का?"

गाजराचा हलवा खाल्ला का?

पंतप्रधान मोदींनी शुभांशु यांना विचारले की, "तुम्ही जो गाजराचा हलवा नेला होता तो खाल्ला का?" त्यावर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला म्हणाले की, "हो, मी गाजराचा हलवा, मूग डाळीचा हलवा आणि आमरस सोबत आणला होता. माझ्यासोबत जे इतर देशांमधून आले आहेत त्यांनाही भारतीय खाद्यसंस्कृतीचा अनुभव मिळावा, म्हणून हे पदार्थ नेले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला आणि सर्वांनाच हे पदार्थ खूप आवडले."

मी पुर्णतः सुरक्षित आणि स्वस्थ...

शुभांशु शुक्ला म्हणाले, "पंतप्रधान मोदीजी, तुमच्या शुभेच्छा आणि 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी येथे पूर्णपणे सुरक्षित आणि स्वस्थ आहे. माझी तब्येत छान आहे, ही एक नवीन आणि विलक्षण अनुभव आहे.

हा प्रवास फक्त माझा नाही, तर संपूर्ण देशाचा आहे. आपल्या नेतृत्वाखालील आजचा भारत तरुणांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी असंख्य संधी देतो आहे. मला येथे भारताचं प्रतिनिधित्व करताना अत्यंत अभिमान वाटतो आहे."

पहिली भावना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज तुम्ही मातृभूमीपासून दूर आहेस पण कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाच्या जवळ आहेस. तुमच्या नावातच शुभ आहे. आणि तुझा हा अंतराळ प्रवास नव्या युगाचा शुभारंभ देखील आहे.

त्यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अंतराळात पोहोचल्यानंतर त्यांच्या मनात आलेल्या पहिल्या विचाराबद्दल विचारले तेव्हा शुक्ला म्हणाले, "सर्वप्रथम जेव्हा आम्ही पृथ्वी पाहिली, तेव्हा मनात आलेला पहिला विचार म्हणजे — पृथ्वी पूर्णपणे एकसंध भासते, बाहेरून कुठलीही सीमा दिसत नाही.

जेव्हा आम्ही भारत पहिल्यांदा पाहिला, तेव्हा भारत खूप भव्य, फार विशाल, प्रभावशाली आणि नकाशावर आपण जो भारत पाहतो त्यापेक्षा कितीतरी मोठा तो दिसतो. बाहेरून पृथ्वी पाहताना असं वाटतं की कुठलाही देश नाही, कुठलीही राज्यसीमा नाही, फक्त एक मानवजात आहे आणि पृथ्वी हे आपल्या सगळ्यांचं एकच घर आहे. आपण सर्वजण त्या एकाच घराचे भाग आहोत."

परिस्थितीशी कसे जुळवून घेतले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधताना त्यांना अंतराळातील परिस्थिती आणि त्या अनुकूल होण्याबद्दल विचारले. त्यावर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला म्हणाले, "इथे सगळं काही वेगळंच आहे. आम्ही एक वर्ष प्रशिक्षण घेतलं आणि विविध प्रणालींबाबत शिकलो.

पण इथे आल्यावर सगळं बदलून गेलं. इथे अगदी लहानसहान गोष्टीही वेगळ्या वाटतात, कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं. इथे झोपणं हेही एक मोठं आव्हान आहे. या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो."

मोदी म्हणतात - भारताचे अंतराळ स्थानक तयार करावे लागेल..

मोदी म्हणाले की, "चांद्रयानच्या यशानंतर देशातील युवकांना विज्ञानात नव्याने रस निर्माण झाला आहे. अंतराळ संशोधनाची नव्याने उमेद जागली आहे. आजच्या मुलं केवळ आकाशाकडे पाहत नाहीत, तर त्यांना वाटतं की ते आकाशाला स्पर्श करू शकतात.

हीच जिद्द आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांची पाया आहे. आपल्याला मिशन गगनयान पुढे नेण्याची गरज आहे, आपलं स्वतःचं अंतराळ स्थानक उभ करावं लागेल, आणि भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरावाच लागेल."

अंतराळात भारतीय शास्त्रज्ञांच्या 7 प्रयोगांवर काम...

शुक्ला म्हणाले की, "मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो आहे की, पहिल्यांदाच भारतीय शास्त्रज्ञांनी सात अनोखे प्रयोग तयार केले आहेत जे मी इथे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आणले आहेत. आज होणारा पहिला प्रयोग स्टेम सेल्स यावर आहे.

माझा प्रयोग यावर केंद्रित आहे की, आपण विशिष्ट पूरक आहार घेऊन अंतराळात मांसपेशींचे नुकसान कसा टाळू शकतो किंवा विलंबित करू शकतो. आपण पाहणार आहोत की हे पूरक पदार्थ पृथ्वीवरील वृद्ध व्यक्तींनाही फायदेशीर ठरू शकतात का?"

16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतोय...

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला म्हणाले की, "भारत वेगाने प्रगती करत आहे. शांतता राखण्यासाठी माइंडफुलनेस (सजगता) खूप महत्त्वाची भूमिका बजावते, कारण प्रशिक्षण आणि प्रक्षेपणाच्या वेळी अनेक तणावाच्या परिस्थिती येतात. माइंडफुलनेस आणि ध्यान हे चांगले निर्णय घेण्यात खूप मदत करतात.

शुक्ला म्हणाले की, "थोड्या वेळापूर्वी मी जेव्हा खिडकीबाहेर पाहत होतो, तेव्हा आम्ही हवाईवरून उडत होतो. आम्हाला प्रत्येक दिवशी 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळतात, कारण आम्ही पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहोत. आपला देश प्रचंड वेगाने प्रगतीच्या वाटेवर आहे."

संवादाचा हा क्षण खूप भावूक आणि आनंददायी...

शुक्ला म्हणाले, "तुमच्याशी आणि 140 कोटी भारतीयांशी संवाद साधल्यावर मला खूप भावुकता आणि आनंद वाटतो. मला खूप अभिमान वाटतो की भारत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला आहे. मी या संपूर्ण प्रवासात खूप काही शिकलो.

हे एकूण देशाचा सामूहिक यश आहे. मी तरुण पिढीला एक संदेश द्यायला इच्छितो की, जर तुम्ही मेहनत केली, तर देशाचा भविष्य उज्वल होईल. आकाशला कोणतीही मर्यादा नसते."

शुभांशु शुक्ला यांचा भारतीय तरूणांना संदेश...

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला म्हणाले की, "मी येथे सर्व धडे आणि अनुभव स्पंजसारखा शोषून घेत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हे धडे आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान ठरतील आणि आपण त्यांचा प्रभावीपणे पुढील मोहिमांमध्ये उपयोग करू.

मी आपल्या तरुण पिढीला एक संदेश देऊ इच्छितो की, भारताने नेहमीच धाडसी आणि मोठी स्वप्ने पाहिली आहेत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाची गरज आहे.

यशस्वी होण्याचा एकच मार्ग नाही, पण प्रत्येक मार्गावर एक गोष्ट समान असते ती म्हणजे तुम्ही कधीही प्रयत्न थांबवले नाही पाहिजेत. जर तुम्ही हा मूलभूत मंत्र स्वीकारला, तर यश आज किंवा उद्या येईलच, नक्कीच येईल." असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news