

दिल्ली: ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराची राळ उठवली आहे. दिल्ली विधानसभा सत्ताधारी आपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेससाठीही महत्वाची आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.३) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आप (आम आदमी पक्ष) सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य कसे धोक्यात आणले जात आहे, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी टीका केली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारवर जोरदार टीका करताना विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा स्वतःच्या प्रतिमेला प्राधान्य देण्याचा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, आप सरकार स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नववीच्या पुढे जाण्याची परवानगी देत आहे. ज्या मुलांना उत्तीर्ण होण्याची खात्री आहे. त्यांनाच पुढे जाऊ दिले जाते. कारण जर त्यांचा निकाल वाईट आला, तर त्यांच्या सरकारची प्रतिष्ठा खराब होईल.
'आप' सरकारने ११ वर्षे वाया घालवली आहेत. माझी सर्वात मोठी विनंती अशी आहे की, दिल्लीतील जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी. तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाण्याचे वचन देतो. दिल्लीत एक डबल इंजिन सरकार येईल. जे प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे जीवन समृद्ध करेल.