

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) करणार आहेत. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (Mango Festival Delhi 2025)
आंबा महोत्सवासंदर्भात खा. वायकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोकणातील देवगड आणि रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या हेतूने दिल्लीत ३० एप्रिल ते १ मे पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यानुसार पंतप्रधान आंबा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत, अशा माहिती खा. वायकर यांनी दिली.
खा. वायकर म्हणाले की, प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीदरम्यान व्यक्त केले होते. दिल्लीतील जास्तीत जास्त आंबाप्रेमींनी या महोत्सवाला भेट देऊन कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही खा. वायकर यांनी केले.
आंबा महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विविध केंद्रीय मंत्र्यांसह विविध राज्यातील खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहेत.
- खासदार रविंद्र वायकर