

नवी दिल्ली; पीटीआय : केंद्रीय अर्थसंकल्पात जाणीवपूर्वक लोकप्रियतावाद टाळण्यात आला आहे. त्याऐवजी नोकर्या आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी भांडवली खर्च वळवण्यात आला आहे. विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे, तशी तळमळ यात प्रतिबिंबित झालेली आहे. त्यामुळेच लोकप्रियता टाळून भांडवली खर्चावर भर दिला असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले.
‘आता नाही तर कधीच नाही,’ असा विचार मी एकदा लाल किल्ल्यावरून बोलून दाखवला होता. आता ‘आपण पूर्णपणे तयार आहोत’, या विचारातून आलेला हा क्षण आहे. आज ही भावना राष्ट्रीय द़ृढनिश्चय बनली आहे. संपूर्ण समाजाचाच तसा संकल्प झाला आहे. त्यातून विकसित राष्ट्र बनण्याची भारताची तत्परता प्रतिबिंबित होते, असे ते म्हणाले. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर ‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोदी म्हणाले की, सरकारने आपल्या कारकिर्दीचा वापर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळातील संरचनात्मक त्रुटी भरून काढण्यासाठी, धाडसी सुधारणांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि विकसित भारताचा पाया रचण्यासाठी केला आहे.
सरकारच्या प्राधान्यक्रमांचे प्रतिबिंब
एक एप्रिलपासून सुरू होणार्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वर्णन करताना मोदी म्हणाले, हा दस्तऐवज म्हणजे आमची प्रशासन शैली आणि प्राधान्यांचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे.
तरुणांना सक्षम करण्याचा संकल्प
तरुणांना जागतिक संधीचा फायदा घेण्यासाठी सक्षम बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे. हा अर्थसंकल्प या प्रवासातील पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो, वेगाने बदलणार्या जागतिक संधींचा फायदा घेता यावा, यासाठी तरुणांना सक्षम करण्याबरोबरच नवोन्मेष क्षेत्राला गती वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
मोदी म्हणाले, भांडवल संचय, कामगार औपचारिकीकरण आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या एकत्रिपणातून भारताचा संभाव्य विकास दर 7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. उत्पादक खर्च हे आमच्या सरकारचे वैशिष्ट्य आहे.
आधीच्या सरकारच्या काळात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष
आमचे लक्ष लोकांचे जीवनमान सुधारण्यावर, आपल्या तरुणांसाठी नोकर्या निर्माण करण्यावर आणि विकसित भारताच्या दिशेने देशाची प्रगती पुढे नेण्यावर आहे, असे मोदी म्हणाले. आधीच्या सरकारने बर्याच काळापासून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे भारतीय व्यवसायांसाठी आव्हान निर्माण झाले होतेे. विकसित भारत निर्माण करण्याची आकांक्षा असलेल्या राष्ट्रात कालबाह्य पायाभूत सुविधांना स्थान नाही, असे मोदी म्हणाले.