

जयपूर; वृत्तसंस्था : पश्चिम आशियातील युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर दोन हजार रुपयांपर्यंत जाऊ शकले असते. तथापि, सरकारने यावर उत्तम व्यवस्थापन करून देशाला २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटातून बाहेर काढले. म्हणूनच सिलिंडर सुमारे ९५० रुपयांना मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर असून, पचपदरा येथे त्यांनी देशातील सर्वात आधुनिक रिफायनरीचे उद्घाटन केले. तसेच, जयपूर मेट्रोच्या फेज-२ ची पायाभरणीही केली. मोदी म्हणाले, पश्चिम आशियामध्ये झालेल्या युद्धामुळे संपूर्ण जगासमोर एकवीसाव्या शतकातील सर्वात मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले होते. तथापि, काळाची पावले ओळखून सरकारने सुयोग्य नियोजन केले. या काळात भारताच्या दृढ शक्तीमुळे सर्वात मोठे संकटही छोटे बनल्याचे दिसून आले. भारताने या काळात आपल्या संसाधनांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर केला. त्यामुळे इंधनाच्या किमती आटोक्यात राहिल्या, असे त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी जोधपूर येथील विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.
आत्मनिर्भरतेच्या दिशेने भक्कम पाऊल
राजस्थानच्या या भूमीतून भारताने विकसित होण्याच्या, आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने खूप मोठे पाऊल उचलले आहे. भाजपची सरकारे प्रकल्पांची केवळ पायाभरणी करून सोडून देत नाहीत. आम्ही ते पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करतो. दोन महिन्यांपूर्वी रिफायनरीमध्ये जो अपघात झाला, त्यानंतर इतक्या वेगाने काम पूर्ण करणे, हे कठोर परिश्रमाचे फळ आहे. आव्हान कितीही मोठे असले तरी नवा भारत आपल्या संकल्पांपासून ना मागे हटतो, ना वेग कमी करतो.